#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

ज्ञानरचनावाद म्हणजे काय ?

ज्ञानरचनावाद म्हणजे काय ?

New

         अलीकडे ज्ञानरचनावाद   हा शब्द  शिक्षणप्रक्रियेत अनेक वेळा वापरला जात आहे .हा ज्ञानरचनावाद एकदम आला कोठून ? इ . प्रश्न आपल्या  मनात येतात .राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF२००५) याचा तो पाया आहेत्याच प्रमाणे बालकांचा मोफत व सक्तीचा  शिक्षणाचा हक्क अधीनियम 2009 (RTE ) मधील कलम  २९ मधेही ज्ञानरचना वादाची तत्त्वे आढळतात. त्यामुळे त्याची ओळख करून घेणे व वर्गाध्यापनामध्ये  त्याचा जास्तीत जास्त वापर  करणे  प्रत्येक शिक्षकाचे आद्य कर्त्यव्य आहे .
   
    आपण  नव्या अनुभवांना सामोरे जातांना त्या अनुभवाच्या आशयांचा आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे  अर्थ लावून  आपण जगत  असलेले  विश्व समजवून  घेणे , या भूमिकेवर ज्ञानरचनावादी तत्त्वज्ञान आधारलेले आहे .
   
   ज्ञानरचनावादी  शिक्षण  प्रक्रियेसंदर्भात प्रामुख्याने पियाजे ,जोहन ड्य़ूई,वायगोटस्की ,ब्रुनर आणि यांच्या विचारंशी  साम्य
असलेल्या  आणखी  काही शास्त्रज्ञानी आपले  विचार मांडलेले आहेत .

   ज्ञानरचनावादाची प्रस्तुती  वेगवेगळ्या शब्दात विविध तज्ञांनी केली असली तरी त्यात कोठेही  विरोधाभास  आढळत नाही .त्या  सर्व तज्ञ्यांच्या विचार नुसार  ज्ञानरचना वादाची  काही प्रमुख  तत्वे  आपणास सांगता येतील .
. ज्ञान हे स्थिती शील static नसून गतिशील DYANAMIC आहे .
. मनुष्य स्वतः शिकत असतो ,आपल्या ज्ञानाची रचना करत असतो .
. पूर्वानुभवाच्या  आधारे  मनुष्य  ज्ञान रचना करतो .
 . सामाजिक , भाषिक व सांस्कृतिक आंतरक्रीयेद्वारे ज्ञानाची निर्मिती होते .
. स्थानिक  परिस्थितीचा / परिसराचा  मोठा वाट ज्ञान रचनेत असतो.
     
     ज्ञानरचानावादी  अध्ययन अध्यापनासाठी  या  तत्त्वांचा समावेश वर्गातील  अध्यन अध्यापन प्रक्रीये मध्ये करावा लागेल . त्यासाठी प्रथम आपण वर्गातील ज्ञानरचनावादी  अध्ययन- अधायापन   प्रक्रिया समजून घेवू.
ज्ञानरचनावादी वर्गाध्यापन

 ज्ञानरचनावादी विचारसरणीनुसार नुसार शिकण्याची प्रक्रिया पुढील  तीन बाबीच्या  सम्यन्व्यातून घडून येते .

पूर्व ज्ञान
शिकवण्याची प्रक्रिया  हि सतत  चालणारी प्रक्रिया आहे. त्यानुसार  या संज्ञेचा  अर्थ  बालक  विशिष्ट नवीन  घटक शिकण्यापूर्वी  त्या घटका संदर्भातील त्याची  आधीची
समज  असा घेता येईल . वर्गातील प्रक्रियेत  शिक्षकाला  मुलाच्या पूर्वज्ञानाचा  विचार करून  अध्ययन  अनुभवाची  निवड व रचना करावी लागेल .

शिकण्याची तयारी
       शिकणाऱ्यांची  शिकण्याची  तयारी करण्यासाठी त्याची  शिकण्याची इच्छा  व त्याची पात्रता  या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे शिकतांना  त्याची भावनिक अवस्था  कशा प्रकारची आहे  हेही  महत्त्वाचे ठरते .भावनिक स्थिरतेतून  भावनिक प्रसन्नतेकडे जाणारी  बालकांची  मन: स्थिती  हि शिकण्यासाठी  योग्य  स्थिती असते .

अध्ययन  अनुभव
       बालकाला  ज्या अनुभावाद्वारे  नवीन ज्ञान प्राप्त  होणर असते तो अध्ययन-अनुभव ; म्हणजे  जो अनुभव  आजवर  त्याने घेतलेला नव्हता असा अनुभव, नवीनता हे त्यांचे वैशिष्ट आहे .या अनुभावाद्वारे नविन माहिती कशा स्वरुपात विद्यार्थ्यांसमोर येते यालाही महत्त्व आहे .अध्ययन अनुभव  जितके संख्येने  जास्त , विषयाला / आशयाला सुसंगत  व समर्पक तेवढा अध्ययनाच्या प्रक्रियेत नेमकेपणा येतो .असे अध्ययन  अनुभव विचारपूर्वक विद्यार्थांना पुरवणे हि जबाबदारी  शिक्षकाची आहे .
    अश्या  प्रकारे  विद्यार्थ्यांचे  पूर्वज्ञान ,त्यांची शिकण्याची तयारी  आणि अध्ययन अनुभव यांचा  योग्य समन्वय वर्गामधील अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये घडवून आणावा लागेल. वर्गामध्ये शिक्षक  जे सांगतील  तसेच विध्यार्थी  करतात .शिक्षक  बोलतात तेच विध्यार्थी  ऐकतात .जोडवर्ग ,मोठे वर्ग , विषयांची  संख्या ,वेगवेगळया चाचण्या ,जोडीला एखादे  दुसरे अशैक्षणिक   काम या परिस्थितीमध्ये  वेळेत पोर्शन  संपवायची कसरत शिक्षक करत असतो . या प्रक्रियेत मुलांना  किती  समजले ,त्यांना काय वाटते , कोणती  गोष्ट त्यांना  कठीण जाते , त्यांना  काही अडले  आहे का, यांसारख्या  गोष्टीना  वेळच मिळत नाही  किंवा दिला जात नाही . लहान मुले उपजतच बहुविध  क्षमतेची  असतात . ती त्यांच्या  अंगभूत क्षमंतानुसार  व गतीनुसार शिकतात  आणि वेगवेगळ्या  पद्धतीने  ज्ञानाच उपयोजन करतात .बालमानसशास्र आणि शिक्षणशास्राने आपल्याला शिकवलेले
हे  धडे  वर्गावर्गात  मात्र दूर्लक्षिले  जातात .शालामंध्ये  बहुतेक वेळा व्याख्यानपद्धती ,फलक लेखन , पाठांतर ,सराव .गृहपाठ  या चाकोरीतून जाणे शिक्षकांना  व त्याची सवय झालेल्या विद्यार्थी, पालक , यांना सोयीचे जाते .अशा पदधतीने  अनेक वर्ष  शिक्षणाची प्रकिया  पार पडत आहे .परंतु याचा अंतिम निष्कर्ष मुले खरेच काही शिकतात का? शिकत  नसतील ,तर तो विद्यार्थ्यांचा  क्षमतेचा ,बुद्धीचा  किवा शिक्षकांच्या  कौशल्याचा दोष मानला जातो , परंतु हे कितपत  खरे आहे ? दोष असेल  तर तो शिकवणे  या पूर्वापार  चालत आलेल्या  संकल्पनेचा  दोष आहे ; हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच  आपण शिकवणे   यावर  लक्ष  काढून घेऊन ते शिकणे यावर केंद्रित  केले पाहिजे ,ज्ञानरचानावाद हि हेच सांगतो .


       ज्ञानरचनावादावर आधारित अध्यापन पद्धती, शाळा रंगवणे, फरशा रंगवणे,साहीत्य तयार करणे, इ. गोष्टींना आपण केल्याच आहेत . सगळीकडे शिक्षणक्षेत्रात,कार्यशाळेत,चर्चासञात ज्ञानरचनावाद ही संकल्पना चांगलीच समजली आहे. नेमका ज्ञानरचनावाद म्हणजे काय?हे सुद्धा समजावून घेतल आहे ,  तर शाळेत येणा-या विद्याथ्र्याला जुन्या संकल्पनेनुसार विद्यार्थी म्हणजे कोरी पाटी किंवा चिखलाचा गोळा... जसा आकार देऊ तसा घडणार...कोरी पाटी हे विद्याथ्र्याचे मन. त्यावर जसे चित्र रेखाटू , जसे शिकवू तेच त्याच्या मनावर बिंबणार ही संकल्पना कालबाह्य झालेली आहे. त्या ठिकाणी ज्ञानरचनावाद या नवीन संकल्पनेने प्रगत महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न अगदी यशस्वीपणे पूर्णत्वास नेण्यास प्रारंभ केला आहे. विद्यार्थी आपल्या जन्मापासून काहीना काही तरी सतत शिकत असतो, परिसरातून, समाजातून, कुटुंबातून त्याच्या दैनंदिन जीवनात जे काही कडू -गोड अनुभव येतात त्या सर्वांची शिदोरी घेऊनच तो शाळेत पाऊल टाकतो, शिक्षकाची समजूत अशी असते की या मुलाला काहीच येत नाही. पण त्या बालकाच्या अंगी काही अनौपचारिक- औपचारिक थोड्या का होईना अनुभवांचा साठा नक्कीच असतोच. तर आपण ज्ञानरचनावादाविषयी अधिक जाणून घेऊया. विद्यार्थांचे पूर्वज्ञान जाणून घेऊन त्याच्या पूर्वज्ञानात भर टाकणे व त्या पूर्वज्ञानाच्या उपयोग करून अधिकाधिक अध्ययन अनुभव प्रात्यक्षिक, तोंडी, लेखी स्वरूपात देणे म्हणजेच ज्ञानरचनावाद होय अस म्हणता येईल.
 बालकांवर शाळेतील व शाळेबाहेरील घटनांचा,व समाजातील वातावरणाचा प्रभाव पडत असतो आणि त्याची दिवसेंदिवस जडणघडण होत असते आणि बालक ते नागरिक हा प्रवास सुरू होतो. पण आपल्या शिक्षण प्रक्रियेत हे बदल काही एका दिवसात घडत नाहीत, प्रत्येक बालक हा विशेष असतो, त्याच्यात काहीना काही चांगले व छान गुण असतातच.केवळ एखाद्या संधीची आवश्यकता असते. जेव्हा बालक स्वत:ला सिद्ध करून दाखवू शकतो की तो सर्वांपेक्षा वेगळा आहे, सामान्य कुवतीच्या बुद्धीची बालके कित्येकदा सातवी- आठवीत गेल्यावर आपल्या बुद्धीची झलक दाखवतात, काहीजण महाविद्यालयीन स्तरावर, काही समाजात, काही व्यवसायात प्रत्येकजण विशेष आहे तो याचमुळे, प्रत्येक विद्याथ्र्याची आवडनिवड लक्षात घेऊनच अध्यापन करणे यथायोग्य ठरेल.

         आजकाल आपण पाहतो की पालकांना, मुलांना पट्कन हुशार करून टाकण्याची खूपच घाई झाली आहे. ब-याच पालकांना, मुलगा हुशार आहे यावर समाधान नाही. त्याने ९५ टक्के गुण त्यापेक्षा जास्त घेतलेच पाहिजेत, पोपटपंची का करेना! त्याला एखाद्या विषयाचा अर्थ समजो किंवा ना समजो त्याचे काही देणेघेणे नाही. ज्ञानरचनावाद ही संकल्पना अशी आहे की, पुस्तकी किडा होणे हे शिक्षणाचे ध्येय नसून त्या विषयाबद्दल स्वअनुभवाने समजून घेणे व संकल्पना दृढ करणे तसेच स्वयंअध्ययनातून शिकणे,कृतीतुन, हसतखेळत , लोळत,मनोरंजनातून ज्ञान, अध्ययन, अनुभवातून जिज्ञासेचे समाधान या सर्व बाबींची पूर्तता या ज्ञानरचनावाद संकल्पनेत होते. उदा. पाढे पाठांतर करणे सोपे आहे; परंतु इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्याथ्र्यांना ३० पर्यंत पाढे पाठ करणे म्हणजे संकटच! पण जर त्यांना फरशीवर चार्ट आखून खडे, मणी,आईसक्रीच्या कांड्या, चिंचोके ,कंचे, यांच्या साह्याने पाढा तयार करून दाखवला तर ते पाढा स्वत: बनवू शकतील केव्हाही...पाढा लवकर पाठ होतो तसा लवकर विसरतोही. गुणाकार व भागाकार या गणितातील क्रियांसाठी पाढे आवश्यक आहेत. गुणाकार म्हणजे काय?, भागाकार म्हणजे काय? हे पाठ करून समजत नाही तर प्रत्यक्ष उदाहरणे सोडवावी लागतात. पाढा कसा तयार होतो हे समजावून सांगताना शिक्षकांना वेळ लागतो.पण जर का त्या विद्याथ्र्याला एकदा पाढा बनवायचे समजले तर तो कितीही संख्येचा, कुठपर्यंतही, कधीही पाढा बनवू शकतो.

          रचनावादामुळे अध्ययन-अध्यापन कंटाळवाणे न होता ते मनोरंजक व प्रभावी बनण्यास मदत होते. डिजिटल शाळा, आयएसओ शाळा या आदर्श शाळा अशाच बनत नाहीत. त्या आदर्श बनवण्यामागे असतो. ज्ञानरचनावादाला आदर्श मानणा-या, कष्टाळू व प्रामाणिक शिक्षकांचेच प्रयत्न आहेत. दुस-याने केले म्हणून आपणही त्याचे अनुकरण करावे का? असे बहुतेकांना वाटते. पण मेंढरासारखे एकच एक सर्वांनी दुस-याचे बघून करणे ही नक्कल आहे ना!
म्हणून आता तरी जागे व्हा प्रगत महाराष्ट्र होण्यास वेळ लागणार नाही.


                 : रचनावाद (कन्स्ट्रक्टिविझम) ऐंशीच्या दशकात लोकप्रिय झाला. ह्या सिद्धान्तानुसार अध्ययन ह्या प्रक्रियेत ज्ञानाची आणि अर्थाची रचना विद्यार्थी/शिकणारा करतो. त्यासाठी तो पूर्वज्ञान, श्रद्धा आणि अनुभव ह्यांचे एकात्मीकरण करतो. ह्या सिद्धान्ताचे आधीच्या सिद्धान्तांपेक्षा मुख्य वेगळेपण असे की ह्यात ज्ञान व्यक्तीच्या बाहेर नसते असे मानले जाते. जगाच्या अनुभवातून आणि वातावरणाशी होणाऱ्या व्यवहारातून ज्ञान व्यक्ती आपल्या स्वतःमध्ये रचते असा विचार यात मांडलेला आहे. रचनावादाचा भर वातावरणावर नियंत्रण ठेवण्यावर नाही. त्याऐवजी ज्ञान आणि कौशल्ये ह्यांचे संश्लेषण/ एकात्मीकरण व्यक्तीच्या अनुभवात होण्यावर येथे भर आहे. येथे इतर सिद्धांतांप्रमाणे स्वतंत्र घटकांवर भर नसून अखंड एकात्मतेवर भर आहे.  

                रचनावादाचे दोन प्रकार आहेत : बोधनात्मक रचनावाद आणि सामाजिक रचनावाद. बोधनात्मक रचनावादाचा भर शिकणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक गुणांवर आणि शिकण्यावर त्यांचा जो परिणाम होतो त्यावर आहे. सामाजिक रचनावादाचा भर सामाजिक देवघेवीतून / आंतरक्रियांमधून अर्थ आणि समज ह्यांची निर्मिती कशी होते यावर आहे. दोन्हींचा दृष्टिकोन आत येणारी माहिती व्यक्तीच्या खास त्याच्या अशा भिंगातून कशी पाहिली जाते आणि तिचा अर्थ लावून ज्ञानसंपादन कसे होते हे पाहण्याचा आहे. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, श्रद्धा, संस्कृती आणि अनुभव ह्यातून ह्या भिंगाची घडण होते. हा जो अर्थ लावला जातो त्यानुसार शिकणाऱ्या व्यक्ती स्कीमाटांची रचना करतात आणि त्यांच्याद्वारे त्यांना काय माहीत आहे हे व्यक्त करतात.
             : ज्यां पिआजे ह्यांनी बोधनात्मक रचनावादाचा सिद्धान्त मांडला. ज्ञान केवळ एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रामित करता येणे शक्य नाही असे ते म्हणतात. ज्ञान अनुभवातूनच शिकावे लागते. अनुभवातून व्यक्ती मानसिक प्रारूपे किंवा स्कीमाटांची रचना करतात आणि ज्ञानाची रचना अशा एकत्र केलेल्या आणि सामावून घेतलेल्या स्कीमाटांमधील बदलांवर आधारित असते. जर आत येणारी माहिती आधीच आत असलेल्या माहितीशी संबंधित असेल तर आधीच अस्तित्वात असलेल्या स्कीमांमध्ये ती एकत्र केली जाते. जर येणारी माहिती आधीच अस्तित्वात असलेल्या माहितीच्या विरोधात असेल तर विसंवाद निर्माण होतो आणि व्यक्तीला एकाच वेळी परस्परविरोधी कल्पनांचा विचार करावा लागतो.  ह्याव्यतिरिक्त आपण आणि आपल्या पर्यावरणामध्ये क्रियांची जी देवाणघेवाण होते त्यावर शिक्षण किंवा अध्ययन अधारित असते असे पिआजे ह्यांचे मत आहे. म्हणूनच वास्तव जगातील अनुभव शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
 सामाजिक रचनावादामध्ये अध्ययनाच्या सामाजिक स्वरूपावर भर आहे. लेव वायगोत्स्की ह्यांच्या प्रतिपादनानुसार अध्ययन ज्या सामाजिक संदर्भामध्ये होते त्यापासून ते वेगळे काढता येत नाही. ज्ञान गोळा होण्याची प्रक्रियाही शिकणारा सामाजिक परिस्थितीशी एकात्म झाल्याखेरीज घडू शकत नाही. अध्ययन ही समन्वयात्मक प्रक्रिया आहे असे सांगून ती समजावून देण्यासाठी त्यांनी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना मांडली.


              ह्या सिद्धान्तानुसार विकासाच्या दोन पातळ्या आहेत. एक पातळी शिकणारा स्वतंत्रपणे गाठू शकतो तर दुसरी संभाव्य पातळी गाठण्यासाठी त्याला शिक्षकाची किंवा सहाध्यायींची मदत लागते. शिकणाऱ्याला एक पायरी वर जाता यावे म्हणून त्याला शिक्षकाचा आधार देण्याची कल्पना ह्यात आहे. ह्या आधाराने शिकणारा स्वतः पायरीपायरीने रचना करीत शिकू लागतो. त्याला शिकता येईनासे झाले की शिक्षकाने पुन्हा त्याला आधार द्यावा आणि आणखी वरच्या पायरीसाठी मार्गदर्शन करावे.
: रचनावादानुसार स्मृती सातत्याने रचली जात असते. आत येणाऱ्या माहितीशी व्यक्तीची जसजशी आंतरक्रिया विशिष्ट संदर्भात होत जाते तसतसे त्या व्यक्तीला आपल्या आधीच्या ज्ञानाचा धांडोळा घ्यावा लागतो. नवी माहिती जोडली जाते किंवा सामावली जाते आणि समज आणखी सखोल आणि सार्थ होत जाते. शिकलेल्या गोष्टी वेगळ्या आणि नवनवीन संदर्भाकडे स्थलांतरित करून वापरण्याचे कौशल्य व्यक्तीला साधू लागते. वास्तव जगातील समस्या सोडविण्याची संधी ही अशा स्थलांतरणासाठी उत्तम संधी असते.


             रचनावादाचे सिद्धान्त शिकण्याचे वेगवेगळे प्रकार न मानता सर्व अध्ययन किंवा शिक्षण संदर्भसापेक्ष आहे असे मानतात. रचनावादी शिक्षण सिद्धान्ताची एक दुबळी बाजू अशी की शिकणारे सगळे जण शिकण्यासाठी येताना आधीचे ज्ञान घेऊन येतात असे मानले जाते. शिकण्याचे उद्दिष्ट हे आधीचे ज्ञान क्रियान्वित करण्याचे आहे असे मानले जाते. पण एखाद्या नव्या क्षेत्राचा अभ्यास करण्यास आलेल्या विद्यार्थ्यांकडे आधीचे ज्ञान असेलच असे नाही. मग त्याच्या आधारावर संरचना कशी उभारणार? चुकीची रचना केली जाण्याचीही शक्यता आहे. म्हणूनच ज्यांच्याकडे पूर्वज्ञान नाही त्यांच्यासाठी ज्ञानात्मकतावादावर आधारित धोरण राबवून संकल्पनांच्या पायऱ्या तयार करून घेणे आणि पूर्वज्ञानाची उणीव भरून काढणे आवश्यक ठरते.
रचनावादाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी केवळ निष्क्रियपणे ज्ञान मिळवीत नसून ते शिकण्याच्या आणि ज्ञानाची रचना करण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी असतात. शिकणे का महत्त्वाचे आहे हे शिकणाऱ्याला उमगावे असे काम शिक्षकाने त्याच्याकडून करवून घ्यावे. म्हणून रचनावादानुसार आपले अध्यापन करणारे शिक्षक केवळ लेक्चरबाजी करीत नाहीत तर विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देऊन तो ज्या पायरीवर आहे त्याच्या वरची पायरी गाठायला तो स्वतःला मदत कशी करू शकेल हे पाहतात. त्यांची भूमिका केवळ व्याख्यात्याची न राहता ती सुविधाकारकाची होते. शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययन शैलींचे भान असणे आवश्यक आहे तरच तो विद्यार्थी शिकत असताना त्याला विचार करण्यास प्रवृत्त करू शकेल.


ज्ञानरचनावाद म्हणजे काय ?
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
           आपल्या देशातल्या औपचारिक शिक्षणाचा इतिहास साधारण दोनेकशे वर्षांचा आहे. ब्रिटीशकाळात मेकॉलेने(१८३५) इथल्या शिक्षणाला औपचारिक चौकट दिली. त्याआधी परंपरेने चालत आलेले शिक्षण इथे सुरु होते. शिक्षणाचा प्रसार-प्रचार झाला. महत्त्व पटल्याने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचा टप्प्याटप्प्याने विस्तार होत गेला. या काळात शिक्षणात निरनिराळे प्रयोग झाले. काळ बदलतो तसे शिक्षण बदलते. सध्या बदलांनी प्रचंड वेग घेतलाय. बालशिक्षणाची दिशा स्पष्ट करणारा २००५चा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २००९साली आलेला शिक्षण हक्काचा कायदा, त्यातल्या निरनिराळ्या तरतुदी, त्यानुसार होणारे निर्णय... वर्तनवादी शिक्षण पद्धतीकडून रचनावादाच्या दिशेने सुरु झालेला प्रवास... एकूणच शिक्षणक्षेत्राच्या दृष्टीने सध्याचा काळ संक्रमणाचा काळ आहे. नव्याने आलेल्या रचनावादाचा कितीही बोलबाला सुरु असला तरी इथले वास्तव अजूनही वर्तनवादीच आहे, हे कसे बरे नाकारता येईल?
शिक्षणासारख्या जनसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या, मुलभूत क्षेत्रात क्रांतिकारक ठरू शकतील, असे हे बदल आहेत. हे मान्यच करावे लागेल. मात्र एका पाठोपाठ एक असे अत्यंत वेगाने आलेल्या या बदलांनी एकूणच शिक्षणविश्वात भांबावलेपण आलेले दिसतेय. या बदलांचे स्वागत करतानाच ते अतिशय काळजीपूर्वक, संयमाने लागू करायला हवे होते, असे वाटत राहते. आता हे बदल अंगावर आलेतच तर मग आता किमान त्यांना सामोरे जाण्यासाठी समाजमन घडविण्याचे काम आगामी काळात सरकार आणि शिक्षणक्षेत्रातील धुरिणांना करावे लागणार आहे. त्यासाठी लोकशिक्षणाला पर्याय नाही.

            नव्याने आलेल्या बदलांविषयी बोलण्याआधी पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे आहे. १९१२ साली जे. बी. वॉटसन नावाच्या अमेरिकन मानसशास्रज्ञाने वर्तन प्रक्रियेचा अभ्यास करून वर्तनवादाची मांडणी केली. मानसशास्र वर्तनाचे शास्र आहे, असे त्याचे मत होते. वर्तनवादाचा जनक वॉटसन मूलत: प्राणीशास्रज्ञ होता. तो परिस्थितीवादी होता. व्यक्तीच्या जडणघडणीत परिस्थितीचा महत्त्वाचा वाटा असतो असे त्याचे आग्रही मत. ' कोणतेही नवजात अर्भक माझ्या हाती द्या. विशिष्ट परिस्थिती निर्माण करून त्यातून मी मिल्टनसारखा श्रेष्ठ कवी सहज घडवू शकेन ', असे उद्गार वॉटसन काढलेले आहेत! हे इथे मुद्दाम लक्षात घेण्यासारखे आहे!
: विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वॉटसन महाशयांच्या या विचारांनी जगभरातल्या अनेक मानसशास्रज्ञांना आकर्षित केले. एकूण कार्याचा विचार करता वर्तनवादी संप्रदायाने मानसशास्रात जशी एकप्रकारची क्रांती घडवून आणली, तशी शिक्षणाच्या परिणामकारकतेतही मोठी भर घातली. शिक्षणातल्या अध्ययन प्रक्रियेचा सखोल विचार करण्याचा प्रयत्न वर्तनावादाने केलाय. किंबहुना काल-परवापर्यंत वर्तन-परिवर्तन हेच शिक्षणाचे खरेखुरे उद्दिष्ट मानले जात होते. विद्यार्थ्यांच्या मन:स्थितीचा निष्कारण बाऊ न करता त्यांच्या शारीरिक वर्तनावर नियंत्रण ठेऊन शिकण्याची प्रक्रिया घडवून आणणे सहज शक्य आहे, हे शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मनावर वर्तनवादाने बिंबवलेय.

            वास्तविक वर्तनवादाच्या (Behaviourism) मांडणीच्या दरम्यान एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात निरनिराळ्या मानसशास्रज्ञांनी रचनावाद (Structuralism), कार्यवाद (Functionalism), साहचर्यवाद (Associationism), मनोविश्लेषणवाद (Psychoanalysm), हेतुवाद (Purposivism), समष्टीवाद (gestallism) वेगवेगळे पाश्चात्य संप्रदाय उद्याला आले होते. मानसशास्राच्या अंगाने शिक्षणाचा विचार करण्याचे ते दिवस असल्याने या सगळ्या संप्रदायांचा कमी अधिक प्रमाणात परिणाम शिक्षण प्रक्रियेवर होत होता. तसा तो आजही होतो आहे
 परिस्थितीच विद्यार्थ्यांना विशिष्ट वर्तन करायला भाग पाडते. एखाद्या व्यक्तीची सामाजिक, कौटुंबिक, शारीरिक परिस्थिती लक्षात घेऊन उपक्रमांचे आयोजन करावे. अज्ञात, अमूर्त मनावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा वर्तन करणारे शरीर, त्या वर्तनाला चेता पुरविणारी परिस्थिती यांचा विचार शिक्षणाने करावा, असा वास्तवमार्ग वर्तनवादाने शिक्षणाला सुचविला. तो स्वीकारलाही गेला. पुढे त्याची एक पोलादी चौकट तयार झाली. तिच्या अनेक मर्यादा होत्या. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप-अमेरिकेत शिक्षण पद्धतीचा पुनर्विचार सुरु झाला. स्व-तंत्र विचार करण्यास प्रवृत्त करणारी ज्ञानरचनावादी पद्धती (Constructivism)आली. वर्तनवाद म्हणजे 'मुलांच्या वर्तनात अपेक्षित बदल होणे म्हणजे शिक्षण', असे मानणारी विचारसरणी. मूल म्हणजे चिखलाचा गोळा! मूल म्हणजे कोरी पाटी! असे जॉन लॉक नावाच्या मानसशास्रज्ञाने सांगून ठेवलेय. शिक्षक हाच ज्ञानाचा स्रोत असतो. केवळ तो शिकवतो म्हणून मुलं शिकतात, असे मानणारे हे तत्त्वज्ञान.

                    ही मांडणी कालसुसंगत असेलही. पण मुलांना मात्र मोठ्या हायरारकीतून जावे लागे. कविता तोंडपाठ म्हणा. पाढे घोका. स्पेलिंग पाठ करा. व्याकरणाचे नियम स्मरणात ठेवा. व्याख्या लिहा... काय काय करावे लागे. डोक्यात माहितीच्या थप्प्या लावायच्या. परीक्षा नावाच्या भितीग्रस्त, प्रचंड शिस्तबद्ध वातावरणातल्या प्लॅटफॉर्मवर सारे खाली करायचे. हुं नाही की चू नाही! परीक्षा म्हणजे व्यवस्थेने आमच्याविरुद्ध पुकारलेले युद्ध आहे, असे मुलांना वाटू लागले! परीक्षांचा अतिरेक झाला. मुलं केवळ परीक्षार्थी बनली. 'समज' विकसित होण्यापेक्षा 'टक्के म्हणजे पक्के' असा समज रूढ झाला. या सगळ्यात स्मरणाला नको इतके महत्त्व होते. फक्त 'हुशार' मुलांना पुढे नेणारी शिक्षण पद्धती अशी टीका होऊ लागली. समाजातल्या उतरंडीत स्मरणशक्ती ज्या वर्गातल्या मुलांचे भांडवल नव्हते, अशा मुलांना हे फार जड जात असे. त्यातून अनेक मुलं शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली गेली असतील, याची कल्पनाच केलेली बरी. मुख्य म्हणजे तेव्हा शिक्षण पद्धतीवर वर्तनवादाचा वरचष्मा होता. वर्तनातील बदलांच्या अंगाने यश-अपयश तपासले जाई. पुढे हावर्ड गार्डनने मेंदूचे विश्लेषण करून बहुविध बुद्धीमात्तांचा सिद्धांत मांडला. मेंदू हाच शिकण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा अवयव आहे, बुद्धिमत्ता एक नसून अनेक प्रकारच्या असतात, असे त्याने ठामपणे सांगितले. पुढे काळानुरूप शिक्षणाचे संदर्भ बदलत गेले. वर्तनवाद म्हणजे जनावरे कसे शिकतात, हे सांगणारे शास्र आहे, याची सत्यता आता आता आपल्याला पटू लागली. तोपर्यंत म्हणजे अगदी काल-परवापर्यंत कुत्री, उंदीर, कबुतरे अशा प्राण्यांवर केलेले प्रयोग मुलांवर करीत राहिलो!

          शिक्षण ही निरंतर बदलत जाणारी प्रक्रिया आहे. समाज बदलतो तसे शिक्षणही आपली कुस बदलत जाते. अलीकडच्या काळात जगभर जी काही संशोधनं झाली. त्यातून शिक्षणात नवे प्रवाह आले. शिक्षणात आधीचा वर्तनवादी विचार मागे पडतो आहे. नव्या संदर्भासह नवी ज्ञानसंरचनावादी (constructivism) विचारसरणी उद्याला आलीय. जीन पियाजे(जर्मनी) आणि वायगोटस्की या दुकलीने याविषयी प्रचंड मोठे काम केले आहे. मुलभूत संशोधन आणि प्रयोगांनंतर जगभरातल्या ठिकठीकाणच्या समुदायांनी या विचारसरणीचे स्वागत केले आहे. १९२५च्या सुमारास या ज्ञानरचनावादी विचारसरणीचा उदय झाला. १९५०च्या आसपास युरोप आणि पुढे १९७०च्या दरम्यान अमेरिकेसह जगभरातल्या इतर देशांत या तत्त्वानुसार बालशिक्षण सुरु झाले. गेल्या काही वर्षांपासून आपणही ज्ञानसंरचनावादी विचारसरणीकडे वळलो आहोत. सरकारी पातळीवर स्वीकार होण्याआधी काही प्रयोगशील शाळांतून या तत्त्वानुसार काम
वर्षांपासून आपणही ज्ञानसंरचनावादी विचारसरणीकडे वळलो आहोत. सरकारी पातळीवर स्वीकार होण्याआधी काही प्रयोगशील शाळांतून या तत्त्वानुसार काम सुरु होते. २००५ साली नवी दिल्ली येथील आपल्या देशातल्या राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) तज्ज्ञांच्या मदतीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला. देशातल्या शिक्षणाची एकूणच दिशा स्पष्ट करणारा, शिक्षण कशासाठी, कसे असावे यामागील भूमिका सांगणारा तो अधिकृत सरकारी दस्ताऐवज आहे. रचनावादी विचारसरणी हा या सगळ्याचा गाभा आहे.

             नव्याने आलेला ज्ञानरचनावाद म्हणजे काय आहे तर मूल कसं शिकतं? याचा सर्व अंगांनी शास्रीय अभ्यास करून केलेली ही मांडणी आहे. मुलं स्वतंत्र विचार करतात. मुलांचे शिकणे केवळ शाळेत नाही; तर घर, परिसर, समाज असे सगळीकडे होते. स्वतःच अनुभवातून ती शिकतात. शिकणे सतत सूरू असते. मुलांची प्रत्येक कृती म्हणजे ज्ञानाचा स्रोत असते. मुलं स्वतः ज्ञानाची निर्मिती करतात, यावर विश्वास दाखवणारे हे तत्त्वज्ञान आहे. मुलांचे जीवन आणि शिक्षण वेगळे करता येत नाही. मात्र त्यांचा मेळ घालायला हवा. जीवनाशी शिक्षण जोडण्यासाठी शिक्षणात मुलांचे सांस्कृतिक भांडवल वापरले पाहिजे. अशा अध्ययन अनुभवांची, कृतींची रेलचेल असली पाहिजे. यावर ज्ञानरचनावादाचा मुख्यत्वेकरून भर आहे. शिक्षण क्षेत्रात सध्या हे नवे वारे वाहत आहेत.

               २००९साली आलेल्या शिक्षण हक्काच्या कायद्यामुळे परीक्षांचे महत्त्व काहीसे कमी झालेय. 'मार्क्सवादा'च्या कचाट्यातून आणि परीक्षांच्या ताणातून बालशिक्षण बाहेर आणलेय, हे बरे झाले. कठोर परीक्षांऐवजी सध्या वर्षभर मुलांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन  सुरु आहे. केवळ पेपर लिहून पास होणे नाही, तर निरनिराळ्या तंत्रांनी मुलांच्या शिकण्याच्या  नोंदी घेतल्या जाताहेत. आठवीपर्यंत गुणांऐवजी श्रेण्या दिल्या जात आहेत. मुलांना व्यक्ती म्हणून समजून आणि सामावून घेणारा, त्यांच्या विश्लेषक वृत्तीला पोषक बालस्नेही दृष्टीकोन शिक्षणात आलाय. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेचे एका अर्थाने लोकशाहीकरण होण्यास मदत होतेय.

              इथे एक गोष्ट लक्षात आणून द्यायचीय. ती म्हणजे कोणतीही जुनी व्यवस्था त्या व्यवस्थेत काम करणाऱ्या बहूतेक घटकांच्या अंगात पक्की मुरलेली असते. त्यामुळे एखादा कायदा आला. अध्यादेश निघाला म्हणून रात्रीत आधीची व्यवस्था बदलता येत नाही. पण पाश्चात्य लोकांचे अंधानुकरण करण्यात आपण भलते पटाईत आहोत. कुठे काही प्रयोग झाले की, वाहवा होते. आपल्या मनाला त्याची भुरळ पडते. खरे तर जग आपल्याला तुम्ही भारी आहात, असे म्हणत असते. आपण मात्र भलत्याच्याच मागे धावत असतो! शहामृगाजवळील कस्तुरीसारखे!!

            एक मात्र खरेय की, आधी म्हटल्याप्रमाणे एका पाठोपाठ एक असे अत्यंत वेगाने आलेल्या बदलांनी शिक्षणविश्वात भांबावलेपण आणलेय. म्हणूनच एकीकडे या बदलांचे स्वागत करताना ते अतिशय काळजीपूर्वक, संयमाने लागू करायला हवे होते असे वाटते. इथला समाज, प्रादेशिकता, संस्कृती त्यातील व्यामिश्रता, गुंतागुंत, लोकांच्या जगण्यातले वैविध्य, शाळांतील सोयीसुविधा, एकूणच शैक्षणिक पर्यावरणावर परिणाम करणारे सारे घटक विचारात घ्यायला हवे होते. तसे झालेले दिसत नाही. सत्तेला वाटते अमुक एक गोष्ट आम्ही ठरवली की ती झाली पाहिजे. बस्स!! असे मोठे धोरणात्मक बदल एक तर लादलेले असतात किंवा ते कुणाचे तरी अनुकरण करण्याच्या प्रवृत्तीतून येत असतात. पण असे करताना ज्यांच्या खांद्यावर तो डोलारा उभा आहे त्यांना ते बदल खरेच झेपू शकतात काय, याचाही विचार होणे महत्त्वाचे ठरते.
           त्यामुळे असे वाटतेय की, हे सारे आणण्यापूर्वी जे लोकं खरंच फिल्डवर असं काम करतायेत त्यांचे अनुभव, मते अभ्यासायला हवी होती. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन त्यावर करावयाच्या उपाययोजना याचा साकल्याने विचार झालेला दिसत नाहीये. एवढा आमुलाग्र बदल शिक्षकांच्या एकदम पचनी पडणं, यासाठी त्यांचं 'मानस' घडवणं. त्यांना पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ देणं. या गोष्टी झाल्याच नाहीत! नवीन गोष्ट वास्तवात आणताना संबंधितांनी जो गृहपाठ करायला हवा होता, तोच काहीसा कच्चाच राहिला असे अनेकांचे म्हणणे आहे. कारण तळातला घटक असलेल्या शिक्षकाच्या पचनी हे बदल पडले नाहीत तर शिक्षण व्यवस्थेपुढेच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिल, अशी साधार भीती मनात आहे.

                    अजून एक गंमत आहे. नवा रचनावादी विचार शिक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणं सुरु असतात. वास्तविक हे तत्त्व लक्षात घेता प्रशिक्षणं अधिकाधिक शिक्षक समावेशी आणि क्रिएटीव्ह झाली पाहिजेत. इथे होतेय उलटेच! ही प्रशिक्षणे १०० टक्के वर्तनवादी पद्धतीने होताहेत. एक व्यक्ती बोलतेय. वर्ग ऐकतोय. अलिकडेच पहिली-दुसरीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणांचीही अशीच दशा झाली. शिक्षण क्षेत्रात 'अस्पृश्य' झालेला वर्तनवाद पुन्हा पेरण्याचे काम सरकारी प्रशिक्षणांतून सुरु आहे. त्याला रचनावादाचे अंकुर फुटतील, फुले-फळे लागतील, असे समजणे निव्वळ भाबडेपणाचे वाटते! बरं प्रशिक्षण संपलं की, नव्या पद्धतीने काम सुरु करायचे आदेश निघतात. प्रशिक्षणं होऊनही त्यातल्या आशय गळतीमुळे शिक्षकांच्या पदरात काहीच पडत नाही. एकूणच प्रशिक्षणांतील गुणवत्ता आणि दर्जा सुधारणेला प्रचंड मोठा वाव आहे. प्रशिक्षणांत शिक्षण क्षेत्रातील कृतीशील तज्ज्ञांशी, अभ्यासकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत संवाद, प्रयोगशील शाळांतील कर्त्याधर्त्या व्यक्तींचा अनुभव शेअर करणे, त्यांचा सहभाग, विविध संकेतस्थळाचा प्रभावी वापर, शैक्षणिक क्लिप्स, माहितीपट दाखवून त्यावर चर्चा, ग्रुप डिस्कशनसवर भर देणे गरजेचे अशा गोष्टी सहज शक्य आहेत. पण यासाठी सरकारीकडे इच्छाशक्ती असायला हवी. आशयहीन प्रशिक्षणांमुळे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, शिक्षण हक्क कायद्याचा अर्थ याबाबत मुख्याध्यापक-शिक्षक, अधिकारी, तज्ज्ञ मंडळी आणि स्वयंसेवी संस्था-संघटनांत एकवाक्यता नाहीये. उलट तिकडे संभ्रम आणि गोंधळाची स्थिती दिसतेय.
             रचनावादी तत्त्वानुसार सर्व शाळांतील कामकाज चालले पाहिजे, ही रास्त अपेक्षा. परंतु सरकारी यंत्रणेतल्या किती घटकांना रचनावाद कळला हे मुळातून शोधावे लागेल. न कळलेल्या लोकांची संख्या दुर्दैवाने मोठी असणार, हे कटुसत्य आहे. सरकारी प्रशिक्षणाचीच एकूण 'ऐशीतैशी' असल्यामुळे रचनावाद या शब्दांपलीकडे बहुतेक शिक्षकांच्या कानावर फारसे काही पडलेलेच नसावे. तात्त्विक, सैद्धांतिक चर्चा करणाऱ्या लोकांची बऱ्याचदा जमिनीवरच्या कामाशी 'सोयरीक' नसते! असे लोक खाली येऊन प्रशिक्षणे देऊन जातात. एक मोठा गॅप पडतो. तो सांधण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. आज घाईघाईने या सगळ्या बदलांना सामोरं जाताना तळातला घटक असलेल्या शिक्षकांच्या मनावर ताण येत असल्याचे दिसतेय. त्यामुळे शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना आठवीपर्यंत किमान संपादणूक पातळीपर्यंत नेण्याची जबाबदारी शिक्षकांवर निश्चित केलीय. हे सारे कसे करायचे याबाबत शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कुठेच मिळत नाही. याचाही अतिरिक्त संबधित ताण शिक्षक आणि शाळांवर येतोय. रचनावादी विचारसरणीने अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली खरी. पण नवीन अभ्यासक्रमात नेमका बदल काय आहे, तो का केलाय, हे शिक्षकांना समजून सांगण्यात व्यवस्था खूपच कमी पडतेय. शिक्षकांपर्यंत हे बदल नीटपणे नाही पोहोचले तर मुलापर्यंत ते कसे जाणार? जसा 'इनपुट तसा तसा आउटकम!'
                   इयत्ता पहिली ते पाचवी ३० विद्यार्थ्यांमागे तर सहावी ते आठवी ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण कायद्याला अभिप्रेत आहे. तेच रचनावादासाठी पोषक आहे. अनुदानित खासगी शाळांच्या बाबतीतही शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर हेच आहे. आज अनेक माध्यमिक शाळांत एका वर्गात ६०, ७०, ८०-८५ मुलं कोंबली जाताहेत. दुबार पद्धतीने शाळा भरविल्या जाताहेत. त्यामुळे त्या-त्या वर्गाला अनुरूप बैठक आणि एकूण मांडणी करण्यात अडचणी येतात. दुबार पद्धतीने चालणाऱ्या शाळांत भौतिक सोयीसुविधांवर जास्तीचा ताण येतो. या मर्यादांमुळे स्वाभाविकच रचनावाद तिथे 'मिसिंग' आहे.
                 शाळांचे पर्यवेक्षण करणारे अधिकारी नवीन संकल्पना स्वीकारायला तयार नाहीत. अजून ते जुनाट धरणांना पक्के चिकटून आहेत. शाळाभेटीला गेलेले अधिकारी दहावीचा निकाल टक्के किती लागला? शिष्यवृत्तीच्या यादीत कितीजण आले? असे पहिल्यांदा विचारतात. फार तर शाळाबाह्य-गैरहजर मुले किती, त्याची कारणे आणि शालेय पोषण आहाराचा मेनू कोणता, अशी विचारपूस होते. हजेरीपट आणि पाठ टाचण अशा दोन ऐतिहासिक दस्तऐवजांवर सह्या झाल्या की शाळा तपासाणी संपते! वार्षिक तपासणीच्या वेळेस कविता म्हणा. हे उदाहरण सोडवा. स्पेलिंग सांगा. वाक्य लिहा. वाचा. यावरून शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन होते. कोणी काही म्हणोत पण आज हेच जमिनीवरचे उघडेनागडे वास्तव आहे! उदाहरणार्थ- ९८१ भागिले ९ असे उदाहरण दिले. मुलांकडून आलेली त्याची उत्तरे निरनिराळी असू शकतात. आपल्याला माहिती असलेली रीत ही गणिततज्ज्ञांच्या मते अनेकातली एक असू शकते. पण शिक्षकच काय कोणीच हे सगळी उत्तरे स्वीकारण्याचा उमदेपणाने दाखवताना दिसत नाहीये. हे बदलायला हवे. शिक्षकाकडून अपेक्षा रचनावादी कामाची. सरकारी यंत्रणेतल्या संबधित घटकांचे वागणे मात्र परंपरावादी! इथे नवे तत्त्व नापास होते!
              सगळ्यात दुर्दैवाची बाब म्हणजे रचनावाद कशाला म्हणतात, त्यानुसार वर्गातले काम कसे करता येईल, हे शिक्षकाला नीट समजून सांगण्यात व्यवस्था अपयशी ठरलीय. शिक्षक आधीच्या वातावरणात शिकलेले आणि रमलेले आहेत. रचनावादी तत्त्वानुसार शिक्षकाने शिकवू नये तर सुलभकाचे काम करावे अशी अपेक्षा आहे. सुलभक (Facilitator) म्हणजे मुलांचे शिकणे सोपे करणारी व्यक्ती. वेगळ्या भाषेत सांगायचे तर सुलभक म्हणजे शिक्षणाची अभिक्रीया घडवून आणणारा उत्प्रेरक! मात्र तसे होत नाही. आजही शिक्षक भाषणे दिल्यासारखे मोठमोठ्यानं बोलतात. मुलं बिचारी गुमान ऐकून घेतात. धडे-कविता वाचल्या जातात. त्याचे 'निरुपण' होते! प्रश्नोत्तरे तपासली जातात. गणिताचे एखादे उदाहरण फळ्यावर सोडवून झाले की, उदाहरणसंग्रह घरी सोडवायचा. व्यवहारी दृष्टीकोनाच्या आभावामुळे गणित विषय मुलांना जड जातो. खडे, काड्या किंवा इतर साहित्य वापरल्यास कृतीची जोड मिळले. विषय सोप्पा होऊ शकेल. मुलांना आवडीने शिकावेसे वाटेल. इंग्लिश विषय अजूनही त्या भाषेच्या व्याकरणातून बाहेर आलेला नाहीये! विज्ञानातले प्रयोग करायचे, निरीक्षणे नोंदवून अनुमान काढायचे. पण शाळांकडे प्रयोगाचे साहित्यच नाहीये. प्रयोगशाळा ही फार पुढची गोष्ट! माध्यमिक विद्यालये काय आणि प्राथमिक शाळा काय स्थिती सारखीच. असलीच तरी दोन-अडीच-तीन हजार मुलांसाठी एक प्रयोगशाळा! बर अनेक प्रयोग साधे साहित्य वापरून सहज करणे शक्य आहे. पण ते शिक्षकांच्या गावी नाही! मुलांची गट चर्चा, परिसर भेटी, अभ्यास सहली, कृतीतून शिकता यावे यासाठी तशा अध्ययन अनुभवांची योजना करणे हे होत नाहीये. हे करताना साधनांची अभावग्रस्तता हे मुख्य कारण नाहीचय. शिक्षकांत स्पष्टता नाहीये. नवीन वातावरणात काम करण्यासाठी आम्ही त्यांचे मानस घडविण्यात कमी पडलो आहोत, याची कबुली दिवून पुढे दुरुस्ती करण्याची ही  वेळ आहे. जमीनीवरचे वास्तव हे असे आहे.
                शिक्षकांना एक्स्पोझर नाही. आवश्यकता असेल तेव्हा मदतीला येईल अशी सपोर्ट सिस्टीम नाही. त्यांचे भरणपोषण नीट होत नाही. हे कमी म्हणून की काय सटरफटर शंभर कामे त्यांच्यामागे लावून दिलेली. सरकारी शाळांत माहितीचा महापूर बारा महिने सुरु असतो. वर्गातले काम नाही झाले तरी चालेल. माहिती वेळेत सादर करावी लागते. रोज एक ना एक माहितीचा अहवाल शिक्षकांना लिहावाच लागतो. तो नेऊन द्यावाच लागतो. पर्यवेक्षकीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांच्या कामाला नीट दिशा देणे अत्यंत गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यातल्या कुमठे भागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांनी रचनावादाचे ३५-४० शाळांतून पथदर्शी काम उभे केलेय. परदेशी अभ्यासक आवर्जून ते समजून घेताहेत. वाई तालुक्यात शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु आहे. मिरजेत नामदेव माळी, माजलगावच्या तृप्ती अंधारे या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी मनावर घेतलेय. एकूण पसऱ्यात हे प्रयत्न तोकडे वाटतात. असे असले तरी इतर अधिकाऱ्यांना, शिक्षकांना हे काम आवर्जून दाखवायला हवे. याचे अनुकरण व्हायला हवे. त्याचा विधायक अर्थाने संसर्ग पोचायला पाहिजे. सर्व मुलं शाळेत आली पाहिजेत. त्यांना सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, असा आग्रह कृतीत यायला हवा. ते सध्या तरी नीटपणे होताना दिसत नाहीये.
                सगळ्या प्रतिकूलतेवर मात करून अनेक उत्साही आणि प्रयोगशील शिक्षक वेगळे काही करू पाहताहेत. त्यांनी समृद्धीची बेटे फुलवलीत. वाळवंटातल्या झाडांची मुळं पाणी शोधतात, तसे शिक्षक नव्या वाटा शोधताहेत. काहीजणांनी स्वयंसेवी संस्थांची, प्रयोगशील शाळांतील जाणकार मंडळींची, अभ्यासकांची, कार्यकर्त्यांची बोटं धरलीत. शिक्षणातले नवे तत्त्व समजून घेताहेत. यंत्रणेतले अधिकारी आणि पालकांच्या अज्ञानामुळे त्यांच्याही पदरी निराशा पडते! मग तेही बे एके बे असा चाकोरीतला रस्ता पकडतात. पुस्तक 'प्रमाण' मानून शिकवत राहतात. निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या इंग्लिश माध्यमाच्या शाळांत केवळ घोकंपट्टी आणि पोपटपंची सुरुय. नवे तत्त्व आलेय, त्याने रोजच्या कामात लवचिकता आणली असली तरी अजून पाठटाचण (Lesson note), घटक नियोजन आणि वार्षिक नियोजन हद्दपार झालेले नाही! हे परंपरावादाचे नाही तर कशाचे लक्षण आहे? रचनावादाचा विचार केवळ मुलांच्या शिकण्याच्या अंगाने होतो आहे. तेच तत्त्व शिक्षकासाठी लागू होते. शिक्षण बालस्नेही असावे तसे ती प्रक्रिया शिक्षकस्नेही असली पाहिजे. एका गावात जास्त दिवस काम केलेला शिक्षक तिथल्या समाजजीवनाशी, संस्कृतीशी एकरूप होत असतो. पण गेल्या तीन वर्षांपासून सुरु झालेल्या प्रशासकीय बदल्यानी शिक्षकांची फेकझोक सुरु झाली. नव्या शिक्षकांना रुळताना वेळ जातो.
                    आधी नमूद केल्याप्रमाणे रचनावादासाठी विशिष्ट प्रकारच्या पार्श्वभूमीची गरज असते. मुलांमध्ये स्वतंत्र विचार, विश्लेषक वृत्ती येण्यासाठी, निरीक्षण शक्ती वाढण्यासाठी कुटुंब आणि समाजात खुलेपणा लागतो. अलीकडेच घडलेला एक नमुनेदार किस्सा पुरेसा बोलका आहे. त्याचे असे झाले की, एका शिक्षकाने घरातल्या नातेवाईकांच्या कोणत्या गोष्टी आवडतात आणि आवडत नाहीत? याविषयी मुलांना लिहून आणायला सांगितले. उद्देश छान होता. पण माझे वडील दारू पितात. सिगारेट ओढतात. आईला मारतात. पत्ते खेळतात. अशा नावडत्या गोष्टी मुलांनी लिहिल्या. त्याची वर्गात मस्त चर्चा झाली. मुलांना योग्य तो संदेश मिळाला होता. मात्र त्यातल्या काही पालकांना या 'प्रकारा'ची कुणकुण लागली. त्यांना ते अजिबात आवडले नव्हते! शाळेत शिकवायचे सोडून हे काय भलते उद्योग सुरु आहेत? असा जाब विचारलाच शिवाय त्या शिक्षकाची तक्रार थेट मुख्याध्यापकाकडे केली गेली. शिक्षकाने भूमिका सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अखेर माफी मागून प्रकरण मिटले. मुलांनी ग्रामसभांना उपस्थित राहीलेले मोठ्यांना आवडत नाही. त्यांना ती नसती लूडबूड वाटते. गावातल्या एखाद्या प्रश्नावर मुलांनी भूमिका घेतली तर तिचे कौतुक सोडाच; जाचच जास्ती. जिथे मुलं मोकळेपणाने बोलू लागलीत. स्वतंत्र विचार करू लागलीत. तिथे पालकांच्या तक्रारी वाढल्यात. मुलं उद्धट बनलीत. शिस्त उरली नाहीये. अशी ओरड होतेय! मुलांनी नजरेला नजर भिडवून बोलणे हा ज्या समाजात 'गुन्हा' ठरतो, तिथे वेगळी अपेक्षा तरी काय करणार? तात्पर्य, ही विचारसरणी पचनी पडण्यासाठी, प्रत्यक्षात आणण्यास समाज म्हणून आपल्यात मोकळेपणा असायला हवा. केवळ भौतिक सुविधांसाठी समाजाचा सहभाग पुरेसा नाही. ज्ञानाच्या निर्मितीतही त्यांची भूमिका आणि सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
                    जिथे चांगले काम सुरु आहे तेथील शिक्षकांचे अनुभव संमिश्र आहेत. सरकारी शाळेत शिकविणाऱ्या आणखीन एका सर्जनशील शिक्षक मित्राने सांगितलेला अनुभव इथे शेअर केला पाहिजे. मुलांना स्वातंत्र्य द्यावे. जीवनानुभवातून शिकू द्यावे. यासाठी खूप प्रयोग, नवे नवे उपक्रम आणि कृती शिक्षक करीत असत. यंदा शाळा सुरु झाल्या तेव्हा पहिल्याच पालक सभेत पालकांनी एका सुरात गंभीर तक्रार केली. ती ऐकून शिक्षक चक्रावून गेले. तक्रार अशी होती की, शाळेतली मुलं कायम वर्गाबाहेर असतात. शाळा भरली की सुटली तेच कळत नाही! तुम्ही मुलांना खूपदा शाळेबाहेर घेऊन जाता. त्यामुळे वेळ वाया जातो. पुस्तकातले नीट शिकणे होत नाही! (रचनावाद पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे शिक्षण नेण्याचा आग्रह धरतो, शिक्षक तसे काही प्रयत्न करीत होते, हे इथे लक्षणीय आहे.) आमच्या मुलांना झाडावर चढायला, डोहात पोहायला शिकवू नका, ते त्यांना आपोआप येईल. शेतात, रानांत नेण्यापेक्षा त्यांना फाडफाड इंग्रजी बोलायला शिकवा... कंप्युटर चालवायला शिकवा. अशा त्यांच्या मागण्या होत्या!
              आजही ग्रामीण आदिवासी भागात अनेक घरांतली पहिलीच पिढी शिकतेय. आता कुठे साक्षर होतेय. शाळेबाहेरच्या जगात कोणी काहीही म्हणोत. नोकरी-करिअरसाठी म्हणजे पैसे कमवण्यासाठी शिक्षण हेच त्यांच्यासमोरचे उद्दिष्ट आहे. आपला रचनावाद त्यांची 'समज' आणि आकलन वाढविण्यावर भर देणार! समज खाऊन पोट भरत नाही, पुस्तकातले गणित सुटले की, आयुष्याचे गणितही आपोआप सुटेल असे पालकांचे म्हणणे येते. इथे आपण निरुत्तर होवून जातो. शाळेत चिमुकल्यांनी बाजार भरविल्यावर सुरुवातीला पालकांना कोण आनंद व्हायचा. तेच पालक अशा उपक्रमांकडे फिरकत नाहीत.

              आठवीपर्यंत नापास नाही, अशी शिक्षण हक्क कायद्यात 'तरतूद' आहे. याचा अर्थ आता आठवीपर्यंत परीक्षा असल्या काय नि नसल्या काय. काही एक फरक पडणार नाही, असा अनेकांचा खास गैरसमज झालाय. खरे तर असा जावईशोध लावत तेव्हा माध्यमांनी अत्यंत उथळपणे भलते चित्र रंगवले. त्यातून चुकीचा संदेश गेला. आता सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाविरुद्ध सध्या मोठीच ओरड सुरु झालीय. पूर्वीप्रमाणेच परीक्षा सुरु करण्याची मागणी पुन्हा जोर धरतेय. आपल्याकडचे कारभारीदेखील पूर्वीप्रमाणेच परीक्षा सुरु करावी यासाठी आग्रही आहेत!
                      मुद्दा असा आहे की, एखादी नवीन पद्धत कुठे पचनी पडतेय, तोच दुसरी... तिसरी...असे बदल होत राहतात. एक गोष्ट लागू केली की थोडासा धीर धरावा लागतो. पण असे होत नाही. एकुणात पुन्हा पूर्वीप्रमाणे परीक्षा घ्याव्या लागणार की काय, अशी अस्वस्थता शिक्षकांमध्ये पसरलीय. एके काळी महाराष्ट्र ही देशाची शिक्षणाची प्रयोगशाळा होती, असे मोठ्या अभिमानाने सांगितले जाई. दरम्यानच्या काळात घसरलेली शिक्षणाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी केवळ कायदा आणून किंवा निव्वळ जुजबी बदल करून भागणार नाही. एक निश्चित धोरण ठरवायला हवे. काही वर्षे सातत्याने संपूर्ण क्षमतेनिशी त्याचा पाठपुरावा व्हावा. सर्व घटकांनी एकमेकावर विश्वास टाकायला हवा. इगो बाजूला केले पाहिजेत. या कामात अनुभवी व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, संघटनांचा तसेच प्रयोगशील शाळांचा सहभाग घेण्यात आम्हाला कोणता कमीपणा वाटतो, हे खरेच कळत नाही. परस्पर सहभागाने, पारदर्शकपणे आणि चिकित्सकपणे एकमेकांचे काम तपासत-सुधारत पुढे जायला हवे. आज हा खुलेपणा शिक्षक, शासन, स्वयंसेवी संस्था सर्वानीच दाखवण्याची आज गरज आहे. या सर्व घटकांच्या संगमावर रचनावादी शिक्षणाचा मळा फुलेल बहरेल, असा विश्वास वाटतो.

11 comments:

  1. अतिशय सोप्या व साध्या शब्दात ज्ञानरचानावाद म्हणजे काय ते समजावून सांगितले आहे . एकूण शिक्षण , अध्ययन पद्धती आणि विद्यार्थी या सगळ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला हे नक्की .
    डॉ. लतिका भानुशाली

    ReplyDelete
  2. धन्यवाद मॅडम, अलीकडच्या काळात शिक्षण पध्दतीत खूप सकारात्मक बदल झालेत. या बदलत्या पध्दतीत आव्हानेही खूप आहेत. विद्यार्थीकेंद्री शिक्षण पध्दतीचा पुरस्कार व स्वीकार सर्वांनीच केलाय. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांचे चित्रच बदलून गेलेय.शैक्षणिक वातावरण आनंददायी झाले आहे. इंग्रजी व मराठी माध्यमाची जी अंकीय दरी तयार झाली होती, जो पालकांचा इंग्रजी शाळेकडचा ओढा होता त्यात ज्ञानरचनावादानाने खूप मोठी घट झाली. मराठी शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते...विद्यार्थ्यांच्या कलेनं घेऊन त्याची आवड कशात आहेत याकडे वैयक्तिक लक्ष देण्यावर भर दिला जातो...
    ज्ञानरचनावाद म्हणजे नेमके काय??(यासारखे दीर्घ प्रश्नांची उत्तरे तशीच दीर्घ... म्हणून)
    एक ठराविक काळानंतर काही गोष्टींचे विस्मरण होते..
    ब्लॉगच्या माध्यमातून या बाबी माझ्या बांधवांपर्यंत मला पोहोचविता येतात..
    आपल्यालाही या पद्धतीने मदत झाली व आपल्याला आवडले.. आपले मत माझ्यापर्यंत पोचविले त्यासाठी आभार...
    धन्यवाद...!

    ReplyDelete
  3. ज्ञानरचनावाद कोणत्या इयत्तेपर्यंत मर्यादित आहे?

    ReplyDelete
    Replies
    1. खरं तर ज्ञानरचनावाद म्हणजे विद्यार्थ्याने ज्ञानाची रचना करणे होय.प्राथमिक स्तरापर्यंत आपण याचा वापर करू शकतो, जर विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकसन झालेलं नसेल तर शिक्षकाने त्याचा वापर पुढेही चालू ठेवावा. मूळ उद्देश बालकाचं शिकणं हा आहे. त्यामुळे त्याला आपण विशिष्ट इयत्तांच्या मर्यादा लावू शकत नाही.
      मी ज्ञानरचनावादाची अभ्यासक नसल्याने हे माझं मत आहे..यात मतमतांतरे असू शकतात.. धन्यवाद!

      Delete
  4. आपला अनुभव व समज अत्यंत चांगली आहे. ज्ञानरचनावाद त्याची गरज आपण तौलनिक दृष्टीने केलेली मांडणी उत्तम आहे. सहजतेने अनुभव कथन केलेले आहेत. धन्यवाद !!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर...महत्वाचा हेतू बालक शिकणं हा आहे...

      Delete
  5. आपण उत्कृष्टपणे शिक्षणाचा आढावा घेतला त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार याचा फायदा नक्कीच होईल

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आपले मनापासून....

      Delete
  6. अतिशय सुंदर रितीने आपण ज्ञानरचना वाद हि संकल्पना समजून दिली . धन्यवाद

    ReplyDelete
  7. आपला हा लेख उत्तम आहे, अभ्यासपूर्ण आहे, आणि उदबोधकही आहे.पालक, शिक्षक आणि समाज ह्या तीनही घटकांच्या आंतरप्रक्रियेतून शिक्षण पद्धती बदलू शकते, पण त्यासाठी या तीनही घटकांवर एकाच वेळी काम करायला हवे हे कोणी लक्षात घेत नाही. त्यामुळे तुमचा हा लेख मी या तीनही घटकांच्या प्रशिक्षणासाठी वापरणार आहे.यातून वस्तुस्थितीची जाणीव व्हायला मदत होईल. आपली मदत अपेक्षित आहे. माझा फोन - 9823918223

    ReplyDelete

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect