आज २१व्या शतकात सुद्धा स्त्रीला पुरुषांच्या आधाराची गरज असावी –- या सारखी शरमेची गोष्ट ती काय? खरंतर आज या घडीला स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची दोन चाके आहेत. रथ चालत असताना दोन्ही चाके बरोबरीने चालली, तरच रथाला अर्थ येतो.परंतु या पुरुष प्रधान समाजात स्त्रीला नेहमी दुय्यम स्थान दिले गेल्याने ब-याचदा स्त्रीची गळचेपी झालेली दिसते. आज काही अंशी जरी स्त्रीला स्वातंत्र्य मिळालेले असले, तरी त्यावर अंकुश घरातल्या पुरुषांचाच राहतो. जसे—I am the boss in my house, & husband permit’s me to say so!मग तो प्रेमाचा असेल नाहीतर सक्तीचा असेल. स्त्री ही सतत कुणाच्या न कुणाच्या तरी दबावा खाली वावरत असते. आणि स्त्रीनेच मुळी ते न कळत स्विकारलेले आहे.तिच्या ते अंगवळणी पडले आहे. पूर्वी राजेशाही काळात स्त्रियांना पुरुषांइतकेच अधिकार होते. त्या समाज व्यवस्थेत ,राजकारणात जातीने लक्ष देत. याची काही उदाहरणे ही आहेत. पूर्वी सुद्धा उपनिषद काळात मैत्रेयी, गार्गी ह्या प्रात:स्मरणीय स्त्रियांना केवढे महत्व प्राप्त झाले होते.त्या काळी सम्राट जनकाच्या सभेत याज्ञवल्क्य ऋषींच्या ज्ञानाची परिक्षा चालली असताना हजर वेदोज्ञ ब्राह्मणांच्या सभेत गार्गीने आत्मप्रयत्नपूर्वक याज्ञवल्क्यंनाच ब्रह्मचर्यासाठी आव्हान दिले होते. तिचे कुशल धनुर्धारीच्या भात्यातील बाणांसारखे ते प्रश्न ऎकून सभेतल्या कुणाला ती स्त्री आहे कि पुरुष आहे याचे भान होते? आपल्या जुन्या गुरुकुलांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी दोघे ही शिकत असत. तेवढी परिपूर्ण समानता अन्यत्र कोठे पहावयास मिळते? पूर्वी जे अधिकार होते ते पुढे का राहिले नाहीत? मधल्या काळात पुरुषांचे वर्चस्व वाढल्याने त्यांनी धर्माच्या नावाखाली स्त्रियांना दुय्यम स्थान दिले. ते टिकवण्यासाठी त्यांनी समाजिक, राजकिय, धार्मिक, सांस्कृतिक प्रक्रिया देखिल केल्या. शिक्षणापासून वंचित केले. बाल विवाह ,सतीची चाल, विधवांचे केशवपन, जरठ कुमारी विवाह, अशा अनिष्ठ प्रथा त्यावेळी पाडून पुरुष संस्कृतीने मधल्या काळात स्त्रीवर अनेक अत्याचार केले. परंतु नंतर समाज सुधारणेच्या कार्यक्रमातुन राजाराम मोहन रॉय, महात्मा फ़ुले, महर्षी अण्णासाहेब कर्वे, पंडीता रमाबाई या समाज सुधारकांनी पुढाकार घेतल्याने आज आपल्याला स्त्रीचे हे नवीन, सुधारीत रुप दिसते आहे. आज तिच्यावर धर्म ,लिंग जात, वंश अशा कोणत्याही प्रकारे पक्षपात होवु नये यासाठी राज्य घटनेत मुलभूत अधिकार ही देण्यात आलेले आहेत. प्रत्येक स्त्रीला कायद्याची माहिती मात्र हवी. आज प्रत्येक स्त्रीने आपण एक समाजातला दबलेला, शोषित , किंवा असहाय्य घटक म्हणुन स्वत:कडे न बघता , स्वतंत्र देशाची मी एक नागरीक आहे व मला या देशात विचाराचे, स्वतंत्र निर्णयाचे स्वातंत्र्य आहे ,हे समजुन घ्यायला हवे.
आज स्त्रियांची क्षितीजे विस्तारलेली दिसू लागलीत. याला कारण नोकरी निमित्ताने तिचे घराबाहेर पडलेले पाऊल म्हणा किंवा शिक्षणाचा परिणाम म्हणा. विकासाच्या तिच्या कक्षा रुंदावल्या आहेत. ती आज डॉक्टरांच्या भूमिकेतून रुग्ण सेवा, कायद्याच्या दृष्टीने न्यायाधिशाच्या आणि वकिलीच्या भूमिकेतून न्याय ही देत आहे. तर साहित्यिकाच्या भूमिकेतून जीवनानुभव शब्दबद्ध करुन वाड;मय समृद्ध करत आहे. वैमानिक बनून गगन भरारी ही घेत आहे. तर राजकारणात पंतप्रधानाची भूमिका ही ती व्यवस्थित पार पाडू शकते. समाजाच्या विविध क्षेत्रात ती भरारी मारत आहे. आज घडीला स्त्रीने कायदे मंडळ, न्याय -व्यवस्था ,प्रशासन आणि प्रसार माध्यम ह्या लोकशाहीच्या प्रमुख आधार स्तंभात सुद्धा उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. मात्र प्रसार माध्यमातून तिने अलिकडे केलेले स्वत:चे प्रदर्शन मात्र रक्त बंबाळ करणारे व सर्व स्त्री जातीला शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. दिलेल्या स्वातंत्राचा गैरवापर करण्यास ती धजावत आहे. त्याचा दुष:परिणाम मात्र पुढची पीढी नक्कीच भोगणार यात वाद नाही. स्त्री ही तुफ़ाना सारखी आहे. घेतलेला वेग आवरण्याची मात्र तिला गरज आहे.
२१व्या शतकात स्त्रीने पाऊल टाकले काय, अन् उंबरठा ओलांडला काय, स्त्रीचे एक नवीनच रुप बघायला मिळू लागले आहे. आज स्त्री खूपच प्रगत अवस्थेत दिसू लागली. जी पूर्वी चूल आणि मूल एवढेच संभाळत होती,ती आज अंतराळात ,साता समुद्रा पलिकडे, एकटी विहार करु लागली आहे. संसदेत बसू लागली,एकटीच देश संभाळू लागली. मेरिट मध्ये तिच पुढे, क्यु मध्ये तिचाच अग्रकम, मॅनेजर पदापर्यंत पोचत पोचत , सरकारी तिजो-यांशी खेळू लागली. महिलांचे प्रश्न सोडवता सोडवता न्यायासनावर विराजमान ही झाली.रिक्षा ट्रक, ट्रॅक्टरच नव्हे , तर रेल्वे सुद्धा चालवू लागली. ड्रायव्हींगचे क्लासेस ही घेवु लागली.घरचे बाहेरचे संभाळता संभाळता संस्कारित मुले ही घडवू लागली. भारताची आदर्श पीढी ही घडवू लागली. कुठं होती दडली इतके दिवस ही स्त्री? दडवुन ,घुसमटवुन ठेवलेली वाफ़ अखेर अशारितीने बाहेर आली? कोंडलेली वाफ़च ती; स्फ़ोट बनून उफ़ाळून आली. जिकडे तिकडे नजर टाकली ,-स्त्रीचेच दर्शन घडवू लागली. नजर जाईल तिथे स्त्रीचेच चित्र. टी.व्ही.वर स्त्री, जाहिरातीच्या मोठमोठ्या पोस्टर्सवर स्त्री. सिनेमा घरात स्त्री, पडद्यावर स्त्री, बॊईज हॊस्टेलमध्ये देखिल स्त्रियांचीच चित्रे. हेअर सलून मध्ये सुद्धा स्त्रीच स्त्री. घरापासून दिल्ली पर्यंत स्त्रीच स्त्री. स्त्रियांचेच दर्शन. कोक, मोबाईल, कॅम्प्युटर, एवढेच नव्हे ,तर सोलर सिस्टीमच्या जहिरातीत स्त्रीच आमची अग्रेसर !
आज आता स्त्रियांचा मुक्त वावर सगळीकडे होताना दिसतो. खरंतर ही एका चांगल्या बदलाचीच चिन्हे आहेत. आज पर्यंत इतकी वर्षे त्यांची मुस्कटदाबीच होती. स्त्रियांचे उंबरठ्या बाहेर पडलेले पाऊल पूर्वी वेगळ्या अर्थाने प्रचलीत होते. तर आज ते एका स्वावलंबी –स्वाभिमानी स्त्रीचे लक्षण समजले जाते. स्त्रियांच्या सुप्त भावनेत एक ’प्रसिद्धीचे वलय’ आहे. प्रत्येक स्त्रीला वाटते की , मी कुणीतरी आहे,मला कुणी तरी ओळखावे, मला प्रसिद्धी मिळावी, माझे स्वतंत्र अस्तित्व असावे. आज काल घरोघरी केबल टी.व्ही.चे आक्रमण झाले आहे. आणि घरोघरी पोहचलेल्या या माध्यमासारखे प्रसिद्धीचा दुसरा सोपा मार्ग कुठला? मालिकांमध्ये प्रत्येकालाच संधी मिळते असे नाही. मग या मालिकांच्या मध्ये मध्ये तरी चमकायला काय हरकत आहे? –म्हणत आज असंख्य स्त्रियाच या प्रसिद्धीच्या ,झगमगत्या क्षेत्राकडे स्वत:हुन शिरल्या. ’स्त्री’ चा आज ही ’वापर’ केला जातो. ’वस्तु’ म्हणुन उपभोग हवा तेंव्हा घेतला जातो. त्यामुळे स्त्रियांची आजही शारीरिक, मानसिक कुंचबणा होत आहे. खरंतर याला स्त्रियाच ब-याचशा जबाबदार आहेत. जाहिरातीतून प्रसिद्धीसाठी त्यांचा मादक वावर वाढल्याने ,त्यांचा हवा तसा जाहिरातदार वापर करुन घेत आहेत. आपल्या कलेचा नसून आपल्या शरिराचा हवा तसा वापर हे जाहिरातदार करतात हे त्या मॉडेल विसरतात. हे निश्चितच निंद्द आहे. या साठी स्त्री संघटनानी त्या अनुषंगाने लोकमत जागृत केल पाहिजे. स्त्रियांनी आपल्याला मिळालेल्या स्वातंत्राचा असा गैरवापर करुन घेवु नये.खरंतर स्त्रियांचे स्थान हे फ़क्त कष्टक-याचेच आहे.पूर्वी स्त्री जशी उंबरठ्याच्या आतच सुरक्षित होती, तिच परिस्थिती पुन्हा उदभवते की काय?-असे वाटते.
याला जबाबदार कोण? यावर उपाय काय? हे कुठे थांबेल?….अशा प्रश्नाची उत्तरे शोधण्यास व योग्य ती पाऊले उचलण्याची खरंच गरज आहे. आधुनिकतेच्या नावाखाली स्त्रियांचे पुरुषी वागणे ,बोलणे, नको तितके “फ़्री” वागणे ,मुलांशी अतिजवळीक मैत्री,उत्तान कपडे ,फ़ॅशन, तसेच टी.व्ही.-सिनेमात नको ती दृष्ये ,हावभाव ,अंगविक्षेप क्लोजअपने दाखवणे . आता तर रिमेक्सच्या नावाखाली घालत असलेला धागडधिंगा तर आपण रोजच विविध चॅनेल्सवर बघतच आहोत. हे देखिल तितकेच कारणीभूत ठरत आहे. कारण जेव्हां टी.व्ही. हे माध्यम नव्हते, तेंव्हा जुन्या सिनेमातुन अशी दृश्ये दाखवली जात नसत.तेंव्हा हे प्रमाण खुपच कमी होते. त्यावेळी अशी प्रेमविषयक भाषा बोलण्यास तरुण मुले सुद्धा धजावत नसत. आज मात्र सर्रास चर्चा होताना दिसतात.याला कारण म्हणजे या स्त्रियांना नको तितके मिळालेले स्वातंत्र्य. आज पालकांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचे लाड म्हणुन त्यांना डोक्यावर बसवायचे तेवढे ठेवले आहे. आपली मुलगी काय कपडे घालती आहे, संगत तिची कशी आहे? तिचे अभ्यासाव्यतिरिक्त अन्य कलागुणांकडे लक्ष्य आहे का? का तिचे काही इतर ही उद्योग चालतात,—याकडे प्रत्येक माता-पित्यांनी लक्ष द्यायला हवे. कारण अतिरिक्त सूट ही देखिल नाशास कारणीभूत ठरते. आपल्या मुलींना “नाही ऐकायची” सवय सुद्धा असायला हवी.नाही नाही ते लाड पुरवताना तिला आपण दरीत ढकलत असतो. स्त्रीला स्वातंत्र्य असे हवे,की ताठ मानेने ती ते निभावू शकेल. बदनामी, खोटेपणा यांच्या वा-याला ही न उभे राहता, स्वतंत्रपणे निर्णय घेणे व त्या बद्दल आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. पण त्याच बरोबर घरातील अन्य व्यक्तिंचा तिच्यावर विश्वास व साथ असेल तर ती स्त्री यशाचे अनेक मार्ग यशस्वीपणे पादाक्रांत करु शकते.
आज ही देशाच्या काही भागात बाल विवाह, सती-प्रथा अशा घटना घडत आहेत.पैशासाठी मुलींना विकले जाते, गर्भात मुलगी असेल तर तिला जन्मापूर्वीच संपवले जाते, काही ठिकाणी हुंड्यासाठी स्त्रीचा बळी जातो, तिची मारहाण होते, एकतर्फ़ी प्रेमातुन मुलींच्या हत्या,त्यांच्यावर ऍसिड फ़ेकणे, बलात्कार होणे, या ना अशा किती तरी अमानुष घटना आज आपल्या समाजात घडत असून आपण नुसती बघ्याची भूमिका घेत असतो. खालच्या वर्गात तर हे प्रमाण खूपच जास्त आहे. हे असेच वर्षानुवर्षे चालतच राहिल.-कारण स्त्रीला निसर्गानेच शारिरीक दृष्ट्या एक बाजू कमकूवत दिली आहे. शारिरीक सौंदर्यामुळे स्त्री अशा अत्याचाराला बळी पडते. आज ती एकटी रात्रीच्या वेळी बाहेर जावु शकत नाही, मग ती कोणत्याही वयाची असो! कारण बलात्कार फ़क्त स्त्रियांवरच होतो, पुरुषांवर नाही.या एकाच गोष्टीत पुरुष स्त्रीच्या पुढे आहे म्हणुन तो तिच्यावर वर्चस्व गाजवु पहातो. आज बलात्कारी स्त्रीला न्याय मिळवताना कोर्टापुढे पुन्हा पुन्हा शाब्दीक बलात्काराला सामोरे जावे लागते. न्यायासनाची ही क्रूर थट्टा पूर्ण थांबली पाहिजे. कुटुंबाने, समाजानेच यात पुढाकार घेवुन बलात्कार करणा-यास योग्यते शासन केले पाहिजे. भारताने स्वातंत्र्याची आज इतकी वर्षे पूर्ण केली, तरी आजची स्त्री ही अभागनच राहीली. आज ३३% आरक्षणासाठी तिला संसदेच्या संमतीची वाट बघत बसावे लागते. तिची ही स्थिती म्हणजे स्त्री जीवनातील रखरखीत वास्तव्य आहे. प्रश्न हा पडतो , कि अशा घटना आपण टाळू शकतो का? निश्चितच उत्तर “हो” असेल. कारण या विश्वातल्या सप्त रसांचा, सप्त गुणांचा –दया, क्षमा, शांती,प्रेम, वात्सल्य,पावित्र्य अन् मांगल्याचा संगम झाला, आणि आजच्या या ’स्त्री’ ने जन्म घेतला. तिच्या नाजुक पायात रुढींच्या बेड्या ठोकल्या होत्या. आज स्त्रीला शिक्षण मिळालं, विकासाच्या संधींच खत पाणी मिळालं, आणि स्त्री रुपी बोनसायचा एक दिवस वटवृक्ष झाला. संसार (कुटुंब) संभाळून ही तिन आपलं कार्यक्षेत्र कधी व्हॊलेंटीना तेरेश्कोवा किंवा कल्पना चावला बनून अवकाश याना पर्यंत नेलं आहे. तर कधी बचेंद्रीपाल म्हणुन एव्हरेस्ट ही सर केलं आहे. आपल्या समोर अनेक आदर्श असताना नाउमेद होवुन चालणार नाही. किरण बेदी, कल्पना चावला, इंदिरा गांधी,अंजली भागवत,पी.टी.उषा, डॊ.राणी बंग, डॊ. अनिता अवचट, सुनिता आमटे,इ अशा अनेक क्षेत्रात भरारी मारलेल्या स्त्रियांची नावे आपण देतो. कल्पना चावला बद्दल आपल्याला सगळ्यांना माहितच आहे.या एकमेव पहिल्या भारतीय महिला –अंतराळ विरांगना ठरलेल्या स्त्रीचा असा दुर्देवी अंत सा-या जगाला चटका लावुन गेला. तर आज सतत ५वर्षे ट्कून रहाने अवघड असताना सतत १० वर्षे महिला पंतप्रधान म्हणुन भारताच्या छाताडावर राज्य करणा-या इंदिरा गांधी ही एक महिलाच होत्या. या आणि अशा अनेक स्त्रियांनी आपले वर्चस्व सिद्धकरुन दाखवल आहे. आपल्या देशाची, या जगाची नागरीक म्हणुन तिनं आपलं कुटुंब संभाळण्याचं कर्तव्य पार पाडून मानवाला आव्हानच जणू दिलं आहे. म्हणुन तिला म्हणतात,”जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जगाते उद्धारी” . पण नुसती पाळण्याची दोरीच तिच्या हाती देण्या ऐवजी विश्वरथाची दोरी दिल्यामुळे तिने–
– हे वचन सिद्ध करुन दाखवले आहे. प्रत्येक स्त्रीच्या मग ती ग्रामिण असो,किंवा शहरी असो, तिच्यात एक अशी सुप्त शक्ती असते,की कोणत्याही येणा-या त्सुनामी संकटाशी दोन हात करु शकेल. निसर्गानेच तिला ही शक्ती दिली आहे. आज स्त्रिला असेच स्वातंत्र्य हवे आहे. आपल्या सुप्त गुणांनी ती दुस-याचे ही जीवन फ़ुलवते. वरिल स्त्रियांच्या उदाहरणांवरुन असे दिसून येते कि, मिळालेल्या संधीचे सोने करण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे. तिच्यातील सामर्थ्याला व गुणांना वाव मात्र मिळायला हवा. शारिरीक सामर्थ्या बरोबरच आवश्यक आहे ते म्हणजे मानसिक सामर्थ्य .अपमान , अन्याय, अत्याचार , यांना जवळपास फ़िरकू द्यायचे नाही, एवढी हिम्मत प्रत्येक स्त्रीने आपल्या अंगी बाळगलीच पाहिजे. स्त्रीने च स्त्रीची दोस्त बनणे काळाची गरज आहे. संसारात संतुष्ट स्त्री म्हणजे साक्षात ऐश्वर्य लक्ष्मीला आमंत्रण देणारी गृहलक्ष्मीच असते, याची जाणीव बहुसंख्य पुरुषांना नसते. काही जणांना पत्नी म्हणजे “पायाखालील वहाण” वाटते. ते तिच्या कडे विकृत दृष्टीनेच बघतात.काहीजण तिचा सारखा अपमान, पाणउतारा करतात .तर काही जण मारहाण करुन तुछ्च, नीच प्रवृत्तीने तिला वागवतात. अशावेळी दुस-या स्त्रियांनीच तिच्या संकटकाळी मदत करणे , चांगल्या गोष्टींना प्रोत्साहीत करणे , व समाजाकडून तिच्यावर होणा-या अन्यायाच्या वेळी बघ्याची भूमिका न घेता ,तिच्या साहाय्यास धावुन जाणे इ.इ. ब-याच बाबतीत ’स्त्री च स्त्रीची उत्तम मदतनीस’ होवु शकते. त्यामुळे तिची मानसिक व शारिरीक कुचंबणा होणार नाही. मग पहा “स्त्री शक्तिची शक्ती” .कुणाची हिम्मत होणार नाही तिला छळायची,त्रास द्यायची. कारण स्त्री शक्ती एकत्र आली,तर काहीही करु शकते. ”अबला नहीं सबला है तू, नारी नहीं चिंगारी है तू !” क्षणात काहीही करण्याची तिची ताकद आहे. राधे सारखे प्रणयिनी रुप, गौरी सारखे ममतामयी रुप,किंवा प्रसंगी दुर्गे सारखे संहारक रुप , आदिमातेने घेतले आहे.या प्रमाणे देवीच्या निरनिराळ्या अवताराची ही स्त्री रुपे आहेत ,हे आपल्याला माहित आहे. ’स्त्री’ ची अनंत रुपे डोळ्यासमोर उभी आहेत…….वात्सल्यमूर्ती, विश्वाचं चैतन्य बीज , त्यागाची प्रतिमा, अनंत काळाची माता …इ. केशवसुतांसारखे प्रतिभावंत महाकवी सुद्धा “भुपृष्ठेस्थित आद्ददैवत” असा तिचा उल्लेख करतात. आजचे स्त्री स्वातंत्र्याचे स्वरुप पहाता ते आभास आहे का? असे वाटत असतानाच , जाणवते कि ,नाही ! पूर्वी पेक्षा किती तरी पटीने आज सुधारणा झाली आहे. आजची स्त्री ब-याच अंशी स्वतंत्र आहे. स्वातंत्र्याची संकल्पना साकार करताना , आपल्याला हवे असे स्वातंत्र्य मिळवताना प्रथम स्त्रीने आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. तिच्या आयुष्यातील काही क्षण तिला फ़क्त स्वत:साठी जगण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. “सातच्या आत घरात” फ़क्त स्त्रीने पुरुषांच्या भीतीने परतले पाहिजे हा लिंगसापेक्ष भेद संपला पाहिजे. “शुभस्य शीघ्रम” या उक्ती नुसार परिवर्तन घडले पाहिजे. एक”माणुस” म्हणुन तिचं स्वत्व,तिच्या अस्मितेची जपवणुक व्हायला हवी, एवढी माफ़क अपेक्षा. “स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे” याचे पुरेपूर भान तर तिला अहेच. स्वातंत्र्याचा दुरुपयोग पण तिने नाही घेतला पाहिजे. “पुरुषांबरोबर स्पर्धा म्हणजे स्त्री स्वातंत्र्य” हे ही तिला मान्य नाही. फ़क्त पुरुषांची दासी न बनता त्याची सहकारी ,मित्र म्हणुन राहायची तिची इच्छा आहे. स्त्री व पुरुषांचे समाजात सहजीवन हवे. समाजरुपी पक्षाचे दोन पंख म्हणजे स्त्री –पुरुष होय. दोन्हीही सारखेच सामर्थ्यशाली हवेत. राममनोहर लोहिया ऐके ठिकाणी म्हणतात, ” स्त्री ही देवी ही नाही , व दासी ही नाही. स्त्री ही माणूस आहे. तिला माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण हक्क आहे.”
शेवटी एवढेच सांगावेसे वाटते , की झेपावणा-या पंखांना क्षितीजे नसतात,त्यांना फ़क्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते. प्रबळ इच्छा शक्ती असणा-या स्त्रीला ’अशक्य’ हा शब्द माहित नसतो.परंतु आपले “ ईप्सित ’’ साधण्यासाठी तिला योग्य मार्गाने जावे लागते. तरच तिचे सर्व प्रयत्न सफ़ल होतील.पाखराला दाणे हवे असतील तर आकाशाला गवसणी घालावी लागते. अर्थात प्रत्येक स्त्रीने सर्व शक्तीनिशी प्रयत्न केला तर तिला अपेक्षित ध्येय,यश नक्कीच प्राप्त होईल. प्रत्येक स्त्रीने कुटुंबाची कर्तव्ये पार पाडत , जेष्ठांना योग्य सन्मान देत ,त्यांच्या सहकार्याने किंवा प्रसंगी प्रत्येकीने स्वत:चा उद्धार स्वत:च करावा!
अशावेळी स्त्रीने आपल्याला हवे तसे स्वातंत्र्य मिळवताना स्वत: बरोबर इतरांना देखिल कमी लेखू नये, धिक्कारु नये,किंवा अवमानू नये……अपमानित तथा अध:पतित ही करु नये. भारतीय स्त्रियां विचारक्षम व्हायला हव्यात. नैतिकबल व आत्मबल हे अधिक महत्वाचे आहे. आचरण पवित्र असले पाहिजे. तसेच प्रत्येक स्त्रीला पती खेरीज पुरुष पुत्रासमान वाटले पाहिजेत. आणि प्रत्येक पुरुषाला देखिल धर्म पत्नी सोडून बाकी सर्व स्त्रीया मातेसमान वाटल्या पाहिजेत. हिंदुस्थान आणि हिंदु धर्म यांविषयी श्रद्धा बाळगायला हवी. जगाकडून आजच्या स्त्रीला अवश्यमेव काही थोडे घ्यायचे आहे, पण त्यापेक्षा अधिक अनंत पटीने द्यायचे आहे.त्यासाठी सर्व स्त्रियांनी समर्थ व्हावयास हवे. आपल्या मनातील गैर भ्रम झाडून टाकून मिळणा-या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करा. त्या साठी “उठा, जागे व्हा, हीच योग्य वेळ आहे…….
“उत्तिष्ठ, जाग्रत , प्राप्य वरान्निबोधत !”
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!