#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Saturday 20 October 2018

प्रगतीच्या प्रकाशवाटा सदर 3-शिक्षणावर बोलू काही..!

प्रगतीच्या प्रकाशवाटा सदर 3


     शिक्षण म्हणजे काय? आणि शिक्षण घेतल्याने काय होतं? प्रत्येकालाच क्षणभर गोंधळात टाकणारे प्रश्न. आपलं संपूर्ण आयुष्यच या 'शिक्षण' नावाच्या शब्दाभोवती फिरत असतं. आज या लेखामध्ये मी शिक्षणावर प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. 



       आपला 'सर्वांगीण विकास' हा शिक्षणामुळे होत असतो. यामध्ये "शालेय शिक्षणाचे" अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याला "शाळेत मिळालेले संस्कार, मूल्य यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो." आज शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले आहे. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व निःशुल्क शिक्षण मिळण्याची कायद्यात तरतूद केली आहे. हा बालकांचा हक्क आहे आणि बालकांना शाळेत पाठवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. असं जर असेल तर मग प्रत्येक मूल शिकलं का? आजही निरक्षरता आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण हेच सांगत आहे की अजून या कायद्याची अंमलबजावणी होणे बाकी आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या अभ्यासानुसार त्यांच्या अहवालात किमान तीन कोटी मुलांनी अद्याप शाळेचे तोंडही पाहिलं नाही. फी चा प्रश्न, गळती, आदिवासी किंवा दलित विद्यार्थ्यांच्या समस्या, या सर्वांचा विचार केला तर हा आकडा खूपच मोठा होईल ! 


      प्राथमिक शिक्षण सक्तीचे करताना ते तितकंच गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असावं यासाठी प्रयत्न होणे फार महत्वाचे आहे. शैक्षणिक ध्येयधोरणे ठरवली जात असताना 'जनसहभाग' असणं तितकंच गरजेचं आहे, कारण "शिक्षण म्हणजे फक्त शिक्षकांची मक्तेदारी नाही!" प्रत्येक मूल जर शिकायला हवं असेल तर त्याच्या पालकाचाही तितकाच विचार व्हायला हवा! कारण शिक्षण जरी सक्तीचं असलं तरी पालकाच्या त्याच्या आपल्या स्वतःच्या गरजा असतात त्या कुठून भागणार ? खेड्यातील पालक तितके सुज्ञ नसतात! गरीबी, स्थलांतर, अंधश्रद्धा अशा समस्यांनी जखडलेला पालक नकळत मुलाला शिक्षणापासून दूर सारतो. अडाणी पालकाला सक्तीच्या शिक्षणाचा कायदा समजत नाही. त्याला शिक्षणाचे महत्त्व नसते. सांगितले तरी त्याला पटेलच असे नाही! त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजांची पुढची गरजच नसते. 



     एकीकडे खेड्यात ही परिस्थिती असताना, शहरातही वेगळ्या समस्याच असतात. शहरातील मुलं शिक्षण घेऊन सुसंस्कारित होतीलच असं तर नाही! केवळ पुस्तके, परीक्षा अन् नोकरी याच्या पलीकडे शिक्षणाचे महत्त्व नाही का? सध्याची शिक्षणपद्धती म्हणजे रोबोट बनविण्याचा कारखानाच म्हणा न! देशाची प्रगती, मार्गदर्शक तत्त्वे, मूल्ये, आदर्श सुजान नागरिक हे सगळ्या बाबी नकळत पायदळी तुडविल्या जात आहेत. अन् इंटरनेटच्या जगात तर शिक्षणाचे तीन तेराच वाजले आहेत!



      "पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण" या संकल्पना कुठेतरी मोडकळीस निघाल्या पाहिजे. स्वतःला सुज्ञ म्हणवणारा हा समाज मात्र अजगरासारखा निपचित पडला आहे! शिक्षणाचा खरा अर्थ येणाऱ्या पिढीला समजला पाहिजे, यासाठी तुम्हां आम्हांला पाऊल उचलण्याची गरज आहे. यासाठी सामाजिक भान ठेवत आपली नैतिक जबाबदारी उचलणं हेच खरं शिक्षण! "शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे" तिला एका साच्यामध्ये टाकून चालणार नाही! 



        प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आपण एक बाजू बघितली. आता या नाण्याची दुसरी बाजू. तुम्ही आम्ही घेतलंल शिक्षण! खरंच, मिळालेल्या शिदोरीवर आपण अजूनही स्वतःला समृद्ध करत आहोत! "सर्वांना शिक्षण मिळावे" म्हणून धडपडणारे शिक्षण प्रेमी आपल्या समाजात आहेत. शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या संस्था आहेत. शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व लाभलेला समाजसुधारकांचा वारसा आहे. हे सर्व शिक्षणाचे फायदे अधोरेखित करतात !



      माझ्या मते, "शिक्षण म्हणजे माणसातला माणूस घडवणं, स्वतःची नैतिक जवाबदारी समजणं, ज्ञानाची जोपासणा करणं, शिक्षणात स्वतःच्या आवडीला प्राधान्य देणं, असलेल्या ज्ञानाला व्यावसायिकतेची जोड असणं, स्वतःला नेहमी अद्ययावत ठेवणार संशोधक वृत्तीचा ज्ञान असणं, गुणवत्तेशी तडजोड न करणारे स्वातंत्र्य असणं म्हणजे खरं शिक्षण."



     "शिक्षण" या विषयी अनेक मतमतांतरे असू शकतात. माझ्या मताशी सर्वच सहमत असतील असं नाही. काही महत्त्वाचे मुद्दे सुटलेही असतील! मी फक्त माझा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद!


लेखिका: आशा ज्ञानदेव चिने

प्राथमिक शिक्षिका

जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी 

ता. सिन्नर, नाशिक

आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा...



No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect