#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Sunday 21 October 2018

प्रगतीच्या प्रकाशवाटा सदर ४ ...शाळाबाह्य विक्रम पुन्हा शाळेला आला....

*शाळाबाह्य अन् शिक्षण !*

 अन् विक्रम पुन्हा शाळेला आला...


            शिक्षण म्हंजी काय रे भाऊ ?
       असं म्हटलं जातं की शिक्षणाने माणूस शहाणा होतो. माझ्याही मनात हा प्रश्न आहे की खरंच शहाणं होण्यासाठी शिक्षणच लागतं का? एकीकडे ज्ञानाचा प्रचंड विस्फोट झालाय अन् दुसरीकडे मात्र गरिबांच्या शिक्षणाचीच भ्रांत? जिथं माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्याचाच मोठा प्रश्न आहे. तिथं ह्या शिक्षणाच्या आणाभाका काय कामाच्या? पोटाची खळगी भरायची कशी? आजची सोय झाली, आता उद्याचं काय? उद्या चूल पेटेल की नाही? असे कित्येक प्रश्न. गरीब- श्रीमंतांतील दरी वाढते आहे. त्यामुळे आज सक्तीचा शिक्षण कायदा अस्तित्वात असूनही शाळाबाह्य मुलांचा प्रश्न मोठाच आहे.

         "सर्वांना शिक्षण" हे ऐकण्यास कितीही छान वाटत असलं तरी, त्याच्या वास्तविकतेला झुगारून चालणार नाही. अशिक्षित पालक (समाज) आणि त्यांची गरिबी हे शिक्षणाला अडसर ठरणारे घटक. गावात पाणीटंचाई, दुष्काळ, अस्वच्छ्ता यांचा जर महापूर असेल तर गरिबी अन् रोगराई जन्म घेणारच ना! गरिबीमुळे शिक्षण कितीही स्वस्त असलं तरी ते नकोस वाटू लागतं. गावातील लोक कामधंद्यानिमित्त सकाळपासून सध्याकाळपर्यंत परगावी जातात. तेवढाच एक रोज मिळेल म्हणून हाताशी आलेल्या लेकरालाही नेतात किंवा छोट्या भावंडाना सांभाळण्यासाठी घरी तरी ठेवतातच. बालमजूर केव्हाच जन्माला येतो. वीटभट्टी, भाजी काढणे, शेतातील इतर मजुरीची कामे या सर्वांच्या इतकी अंगवळणी पडतात की पाटी पेन्सिल नकोशी वाटते. त्यातून मन उबगते. पालक थकतात तेव्हा किंवा इतर कारणांनी व्यसनांचा सहारा घेतात. दारू, गुटखा, तंबाखू हातात आले म्हणजे नकळत घरगुती हिंसेलाही वळण लागते. अन् हळूहळू नित्यक्रमच. 

        जिथल्या गावात अशी परिस्थिती असेल, त्या गावाचा अन् शाळेचा विकास फक्त देवदूतच करू शकतो. हो! *माझ्या गुरेवाडी शाळेतील इयत्ता चौथीत शिकणारा विक्रम खूप दिवसांपासून गैरहजर होता.* मी दररोज त्याच्या घरी जायचे पण घराला कुलूप असायचे. मजूर वर्ग असल्याने शेजारी कुणी भेटेल अशी शक्यता कमीच. अन् भेटले तरी त्याच्याविषयी बोलणे टाळत असे. काय कारण असेल? कुठे गेला असेल तो? गावात कोणालाच माहित नाही का? कोणीच सहकार्य का करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न. वर्गातल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली तर तो गावाला गेल्याचे समजले, पण कुठे? नाही माहित! दररोज तोच उद्योग. विक्रमचे काही समजले का रे! गावातच राहणारी विक्रमची आत्या म्हणाली, "विक्रमच्या आई- बापाचं भांडाण झालं अन् विक्रमची आई त्याला सोबत घेऊन माहेरी सोनगिरीला गेली अन् आता विक्रम आईसोबत मामा-मामी कडं राहतो." आत्याने सांगितले की त्याच्या आजीची भेट घ्या.

         मजुरीहून येताच त्यांनी आजीला निरोप दिला. तेव्हा दुसऱ्या दिवशी आजीची भेट झाली. त्यांनी सांगितलं की सुनेच्या दहव्याला येणार हायती. पण कसलं काय? विकोपाला गेलेलं भांडण तिथं काय हा दहावा काय करेल? झालं! पुन्हा आजीशी चर्चा! काय झालं? पण ती आजी आज ह्या मळ्यात तर उद्या त्या मळ्यात. कशीबशी भेट घेतली! "आम्ही फोन केला पण ती फोनवर येत नाही! तिला इकडं यायचंच नाही!" असं आजी बोलली. "मला नंबर द्या," म्हटलं तर "इकडचे फोन उचलत नाही", असं हजरजबाबी उत्तर. मग मी विनंती, उद्बोधन केलं की, "तुमच्या भांडणात विक्रमच शैक्षणिक नुकसान होतंय", तेव्हा कुठं नंबर मिळाला. लगेच फोन केला तर तिकडच्या आजी बोलल्या की, "त्याचा दाखला देऊन टाका!" फोनवर दाखला! मला क्षणासाठी वाटलं की खरंच खूपच सुधारणा झाल्यात वाटतं! आपल्यालाच अजुन माहीत नाही. त्यांना समजावून सांगितलं व मी विक्रमला घ्यायला येते, त्याला माझ्यासोबत पाठवा, अशी विनंतीवजा सूचना केली. त्याच्या आईशी बोलून सकाळी सांगते. असं उत्तर आजीकडून मिळालं. 

        दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन केला व काय ठरलं? असं विचारलं! तर या तुम्ही घ्यायला म्हणून होकार मिळाला. अर्धा गड सर झाला! शनिवार होता,  सकाळची शाळा. गुरेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा मॅडमची परवानगी घेऊन विक्रमच्या गावी 'सोनगिरी' येथे निघालो. सिन्नर पासून वीस किलोमीटरचे अंतर. सोबत विक्रमच्या बहिणीला घेतलं. खूप बिकट, आडवळणी, दऱ्या खोऱ्यांचा अन् खराब रस्ता! मजल दर करत सोनगिरीला पोहचलो. विक्रमला बघून मला खूप आनंद झाला. उरलेला अर्धा गड पूर्ण सर झाल्यासारखं. सर्वजण व्यवस्थित वागले,पण "मी येणार नाही!" असं विक्रमच्या आईचं वाक्य मला रडवेलं करून गेलं. मग त्याच्या शाळेचं काय असा प्रश्न मी लगेच टाकला, तर "त्याला घेऊन जा व सांभाळा". असं विक्रमची आई बोलली. तेव्हा मला हायसं वाटलं. विक्रमला घेऊन आम्ही परतीच्या प्रवासास निघालो. शाळेत पोहचताच विक्रम आपल्या मित्रांसमवेत लगेच मिसळून गेला. गावातील मंडळी ही हे चित्र बघून अवाक् झाली व आश्चर्य व्यक्त करू लागली. 

        खरं तर विक्रम शाळाबाह्य झाला त्याला कारण होतं नवरा - बायकोचं भांडण. विक्रमसारखे आणखी दोन चार विद्यार्थी शाळाबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. वीटभट्टीला जाणे, जनावरे चारणे व आई बापासोबत मजुरीने जाणे म्हणून कुटुंबे स्थलांतरित आहेत. अशा गांजलेल्या समस्या असेल तिथं शिक्षक काय करणार? आणि गुणवत्ता नावाच्या शस्राला तरी कुठवर धार राहणार,! म्हणून शासनाने गावातच किमान रोजगार उपलब्ध करावा, नाहीतर शिक्षण नावाच्या हत्याराला गरिबीच्या जगात शून्य किंमत राहील! 
पहा व्हिडिओ




लेखिका, वर्गशिक्षिका
आशा ज्ञानदेव चिने
शाळा गुरेवाडी, ता. सिन्नर, नाशिक

आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा..




No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect