#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Sunday 30 June 2019

प्रगतीची प्रकाशवाट सदर ८



प्रगतीची प्रकाशवाट सदर ८

...अखेर गुरेवाडीच्या प्रगतीची वाट प्रकाशमय झाली.



     आता महत्त्वाचा प्रश्न होता तो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा. एकूण सर्वच वातावरण बघता... मला अंदाज होता, की मला अजून किती काम करायचं आहे. विद्यार्थी सकाळी शाळेत वेळेवर येत नव्हते. दररोज हजर राहत नव्हते. दिलेला अभ्यास वेळेवर करत नव्हते. अभ्यासाच्या सवयी लागण्याची सुद्धा सवय लावावी लागते. त्यात नावीन्य हवं असतं. प्रलोभने देऊन, विविध क्लुप्त्या वापरून, नाविन्यपूर्ण पद्धती वापरूनच विद्यार्थ्यांना शाळेची आवड तयार होते. एकूणच काय तर विद्यार्थ्यांना काय आवडतं याचा शोध घेऊ लागले आणि नकळत तेही उत्तर मिळाले ! 





जसं पावसाच्या सरींनी मन धुंद होतं,


वातावरण आल्हाददायक बनतं,
... अगदी तसंच !

     अशी वातावरण निर्मिती फक्त हलक्याफुलक्या उपक्रमांनीच होईल व शिक्षण आनंददायी बनेल. म्हणून मी लागलीच अशा उपक्रमांची यादी बनवली. 


➤ अप्रगतसाठी माझे उपक्रम

⟹ डिजीटल ज्ञानरचनावाद

⟹ माझा ज्ञानरचनावाद

⟹ टाकाऊपासून शैक्षणिक साहित्य निर्मिती

⟹ इ लर्निंग

⟹ नाव पट्ट्या

⟹ चित्रात रंग भरणे

⟹ बालमित्र सदर

⟹ मातीकाम

⟹ लक्षात ठेवा व लिहा

⟹ शब्द्चक्र व गम्मत

⟹ जोडोब्लॉक

⟹ खड्यांची कलाकृती

⏩ गृहभेटी - एक यशस्वी उपक्रम

⏩ वृक्षारोपण करूया नवजीवनासाठी

⏩ स्वच्छता

⏩ पालकत्व

⏩ मोकळीका

वरील सर्व उपक्रम बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा....

        खूप सारे विद्यार्थ्यांच्या आवडीचे साधे व सोपे उपक्रम घेतले. हे उपक्रम खूप उपयोगी ठरले. खूप भिन्न असणाऱ्या परिस्थितीत असे उपक्रम विद्यार्थ्यांना बहरण्यासाठी मदत करून गेले. विद्यार्थ्यांच्या वाचन लेखनात कमालीचा बदल जाणवू लागला. त्यांच्यातील आत्मविश्वास चकाकू लागला.

         अस्वच्छता, अनुपस्थिती व गुणवत्ता या त्रिसूत्री वर रामबाण ठरले. असे हे उपक्रम नक्कीच प्रभावी आहेत असे मला वाटते.  

      यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप सारे बदल मी बघितले. शाळेची आवड नसणारे, अभ्यासाची आवड नसणारे, विनाकारण शाळेतून पळून जाणारे, खेळाच्या नावाखाली शाळेत न येणारे सगळेच विद्यार्थी आता आवडीने शाळेत येऊ लागले. शिक्षक आपलेसे वाटल्याने शाळासुद्धा आपलीशी वाटू लागली. विद्यार्थ्यांच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात, प्रत्येक गोष्टीत बदल जाणवू लागला. शासनाने प्रत्येक इयत्तेला ठरवून दिलेला पाठ्यक्रम शिकवावा की त्या ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करून आपली अध्यापन पद्धती राबवावी हे तेथील शिक्षकाला समजलं पाहिजे तरच असे विद्यार्थी शाळेच्या मुख्य प्रवाहात येतील. मलाही समोर असलेल्या परिस्थितीत स्वतःची अध्यापन पद्धती वापरावी लागली आणि त्यामुळे घडून आलेला बदल माझ्यासाठी अविश्वसनीयच होता. 

      विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा खेळ आणि नाचणे फार आवडते. उपस्थितीचा प्रश्न असणाऱ्या या भागात मला त्यांच्या याच आवडीचा फायदा करून घेता आला. विद्यार्थ्यांना परिपाठात तसेच मधल्या सुट्टीनंतर किंवा एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांच्या मर्जीनुसार विविध बालगीतं बसवले. याचा फायदा असा झाला की विद्यार्थ्यांची नाचण्याची इच्छा पूर्ण होऊ लागली व आपल्या सवंगड्यांसोबत आपल्याला नाचायला मिळते, त्यामुळे विद्यार्थी शाळेचा रस्ता धरू लागले. दिवाळीच्या सुट्टीनंतर उपस्थितीवर परिणाम होतो म्हणून मी शाळेत स्नेहसंमेलन आयोजन करण्याचे ठरविले. दररोज तयारी घ्यायचे. आपल्यालासुद्धा सहभाग घेता यावा म्हणून प्रत्येक विद्यार्थी दररोज शाळेत येऊ लागला. दरम्यानच्या काळात १००% उपस्थिती होती. याचाच फायदा घेत मी विद्यार्थ्यांकडून हवा तसा अभ्यास करून घेऊ लागले. गावालाही हे सगळं नवीन वाटत होतं कारण यापूर्वी स्नेहसंमेलन शाळेत झालेलं नव्हतं म्हणून त्याची तयारीपासून स्नेहसंमेलन कार्यक्रम साजरा होईपर्यंत गावात उत्साहाचे वातावरण होते. 

      २६ जानेवारी २०१९ ला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झेंडावंदन झाल्यानंतर बालाविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा गुरेवाडी गावातील ऐतिहासिक क्षण झाला. कारण यापूर्वी कधीही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना बघून या सगळ्यांचे खूप कौतुक वाटले. विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग घेतला. एकूण १४ गीते बसविली. त्यासाठी लागणारा मंडप, बॅनर, कॉस्च्युम, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी चा सर्व खर्च मी केला. हे सर्व बघून गाव अवाक् झाले. माझ्यासाठी सुद्धा हा खूप आनंदाचा क्षण होता कारण त्यातून मला आत्मिक आनंद मिळाला होता. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद हा मला देवाच्या चरणी अर्पण केलेल्या फुलापेक्षाही जास्त वाटला. गावासाठी आता मी जणू गळ्यातील ताईत झाले होते. गाव माझ्या शब्दांवर, सांगण्यावर विश्वास ठेवत होते ; नव्हे त्यांना विश्वास बसला होता. पालकांचा शिक्षणावर विश्वास बसला. पालक आपल्याच बालकांचा कौतुक करू लागले. .....आणि अखेर गुरेवाडीच्या प्रगतीची वाट प्रकाशमय झाली.

     ह्या एका शैक्षणिक वर्षातील गुरेवाडी शाळेत झालेला हा बदल अविश्वसनीय होता. मला मिळालेली संधीचं मला सोनं करता आलं असं मला वाटतं. 

     गुरेवाडी शाळेतील माझ्या कामाने माझ्या आयुष्यात ही खूप सारे बदल घडवून आणले. सिन्नर तालुक्यात माझी नवीन ओळख तयार झाली. आणि त्याच सोबत माझी नव्याने बदली जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा डुबेरे तालुका सिन्नर येथे झाली. 16 जून 2019 ला मी नवीन शाळेत रुजू झाले व गुरेवाडीतील माझा प्रवास एक वर्षातच संपला. ह्या एका वर्षातील गुरेवाडी शाळेतील माझा प्रवास माझ्या अखंड सेवेतील अविस्मरणीय काळ राहील.

आशा चिने, गुरेवाडी...
(कार्यकाळ ३१/५/२०१८ ते १५/६/२०१९)
...........समाप्त
गुरेवाडी शाळेचा संपूर्ण शाळा प्रवास ...नक्की पहा ..





नवीन शाळा
जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा डुबेरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक


...१६/०६/२०१९ पासून ....

प्रगतीच्या प्रकाशवाटा सदर ७

प्रगतीच्या प्रकाशवाटा सदर ७
     
          दि 22/8/2018 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरेवाडी येथे स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण, 2018 अंतर्गत केंद्रीय पथकाने भेट दिली व स्वच्छतेविषयी समाधान व्यक्त केले.
        ग्राम विकास विभाग व शिक्षण विभाग यासाठी दोन दिवसांपासून कसून कामाला लागला होता. गुरेवाडी शाळा व गावात स्वच्छता विषयक आवश्यक ती कामे व सोई यानिमित्ताने राबविल्या गेल्यात. 
       मी तर म्हणेन अगदी योग्य गावाची निवड झाली. निमित्ताने या गावासाठी अगदी पेचीदा असणारा स्वच्छता हा विषय नाजूक पध्दतीने हाताळला गेला. सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग तहान भूक विसरून काय करता येईल व सर्वेक्षण सकारात्मक पध्दतीने व्हावं यासाठी प्रयत्न करता येईल. 
       गावातील कचरा व त्याची विल्हेवाट, सांडपाणी, स्वच्छतागृह स्वच्छता व बांधणी तसेच त्यासाठी योग्य स्वच्छता साहित्य, वृक्षारोपण, स्वच्छता संदेश व प्रबोधन, शाळा दुरुस्ती व आवश्यक रंगरंगोटी व सजावट, विद्यार्थ्यांची वैकक्तीक स्वच्छता- केस व नखे कापणे या अन् आणखी कित्येक बाबी गुरेवाडी गावात व शाळेत केल्या गेल्या.
   या कामासाठी शिक्षण विभागाचे खंबीर व धाडसी नेतृत्व गटशिक्षणाधिकारी मा. निर्मळ साहेब, विस्तार अधिकारी साळुंखे मॅडम, केंद्रप्रमुख भुजबळ सर, मुसळगाव शाळेचे ठाकरे सर व सर्व शिक्षकवृंद विद्यार्थ्यांसह, गुरेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा मॅडम, आणखी इतर शाळांचे काही शिक्षक मला नावे माहीत नाही त्यांनी फलकलेखन केले. हे सर्वजण स्वतः स्वच्छता करत होते. व आजही मुसळगाव शाळेने पथनाट्य, गीत, लेझीम या सर्वांनी गावात व शाळेत वातावरण निर्मिती करून गुरेवाडीची शान वाढविली. या सर्वांना ठाकरे सर, सायाळेकर मॅडम व त्यांच्या टीमने मार्गदर्शन केले. 
        ग्रामविकासचे अधिकारी वर्ग अगदी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक संघ, अधिपरिचारिका, आशा वर्कर हे सर्व तसेच सर्व जबाबदार घटक, गुरेवाडी गावातील काही कामसू व्यक्ती हे सर्व गावाचा कायापालट होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत होते.

       खूप आनंद होतोय सांगताना, खरंच गुरेवाडीचं भाग्यच उदयाला आलं. गावाची मी म्हणेन शाळेची  ओळखच बदलली. प्रत्येकाने इथे श्रम ओतले म्हणून त्यात प्रत्येकाचा खारीचा वाटा असेल. सर्वच बाबी चांगल्या व्हाव्यात म्हणून निर्मळ साहेबांनी खूप छान मार्गदर्शन व सहकार्य केलं. आवश्यक त्या सूचना केल्या. कार्यक्रम यशस्वी झाला.

तसेच....
सेवाभावी संस्थेची मदत

      एकीकडे झपाट्याने देश बदलत आहे. कोणताही व्यक्ती हाच विचार करतो की मी माझं पाऊल सर्वांच्या पुढं असायला हवं. गुरेवाडीची परिस्थिती मात्र याच्या पूर्णतः विरुद्ध. तालुक्यापासून जेमतेम चार किलोमीटर अंतर, हायवेलगतची शाळा, पण इथले प्रश्न मात्र एकदम गांजलेले. आपणही किमान या जगाच्या बरोबरीने चालायला पाहिजे असा विचार यांच्या मनात डोकावतच नसेलच का? 


       माझं प्रथम ध्येय होतं.. गुरेवाडीतील समस्यारुपी ड्रॅगनला संपवण्याचं. हद्दपार नाही पण त्याला धडा शिकवण्याचं. असं वाटायचं, परिकथेतील परीसारखी जादूची कांडी फिरवावी, अन् सगळी परिस्थिती स्वच्छ करावी, मनाजोगी, हवी तशी. हो ! अगदी बरोबर आहे ; अशा परिस्थितीत फक्त जादूची कांडीच काम करू शकते ! आणि इथे परिकथेतील परी नाही ; तर देवाने परीचं काम माझ्यावरचं सोपवलं होतं. देवाची निवड चुकली नव्हती. आणि आता मलाही तोच मार्ग दाखवणार होता. आणि खरंच तसंच घडलं. परिस्थितीचा अभ्यास झाल्यानंतर मला काय करायचं ? ते उमगलं.


       परिसरात झाडे नसल्याने वातावरणात अगदीच निरस होतं. आवश्यक ते सर्व खड्डे स्वतः खोदून त्यात बिया लागवड केल्या तसेच काही झाडे विकत आणली काही कुंड्यांमध्ये लावली. पण तरीही वातावरण हवं तसं प्रसन्न नव्हतं.


       इथली परिस्थिती बदलायला कोणीही हातभार लावणार नाही हे समजल्यानंतर स्वतःच्या खिशात हात घातला आणि कामास सुरुवात केली. ज्या वातावरणात आपण दिवसभर राहतो ते वातावरण प्रसन्न असेल तर आपणही काम करू शकत नाही. म्हणून बेरंग झालेल्या इमारतीला प्रथम रंग देण्याचे ठरवले. स्वातंत्र्यदिन दोन चार दिवसांवर येऊन ठेपला होता. अधिवेशन काळातल्या सुट्टीमध्ये तीन दिवस शाळेचे अंतरंग व बहिरंग रंगवून टाकले. शाळेच्या दोन वेगवेगळ्या इमारती असल्यामुळे एक इमारत रंगवलेली व न रंगवलेली, त्यामुळे मॅडमने सुद्धा स्वखर्चाने इमारत रंगवून घेतली. शाळा आता मोहक दिसू लागली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रथमच संपूर्ण गाव झेंडावंदन साठी शाळेत हजर झाला बदललेले चित्र पाहून शिक्षकांचे कौतुक करू लागला. शिक्षकांनी स्वखर्चाने इमारती रंगवल्या. परंतु लोकांचा जर लोकसहभाग राहिला असता तर आणखी वेगळे चित्र इथे तयार झाले असते, आव्हान केल्यानंतर काही पालकांनी तुटपुंजा का होईना ! लोकसहभाग जमवायला सुरुवात केली. लोकांची ही शाळेबद्दलची आस्था वाढली. त्यांना प्रथमच शाळा ही आपली असल्याचा आनंद वाटू लागला. 


        बदल घडतोय ! आपणही बदलायला हवे ! आता या भावनेने पालकांच्या मनात जन्म घेतला. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. स्वच्छतेच्या बाबतीत गावकऱ्यांना आवाहन केलं, की शाळा आपली आहे, ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे. मग आपण पालक शाळेत येऊन व्हरांड्यात , परिसरात गुटखा तसेच तत्सम पदार्थ खाऊन घाण का करता ? ती सवय तुम्हाला बदलावे लागेल. पालकांनाही ते पटले व हळूहळू त्यात बदल व्हायला सुरुवात झाली. शाळेला आवार भिंत नसल्याने मात्र तेवढा परिणाम बघायला मिळाला नाही. मजूर पालक वर्ग असल्याने रात्री शाळेमध्ये बसण्यासाठी येत असे. त्या गोष्टीला आळा घालणं खूप गरजेचं होतं. 


       शाळेच्या अंतरंग - बाह्यरंग, स्वच्छता यामध्ये महत्वाचा विषय होता विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता. त्यात विद्यार्थ्यांची नखे, कपडे, दात व आंघोळ यांची स्वच्छता. वारंवार सांगून देखील यात मात्र बदल होत नव्हता. पाऊसही वेळेवर नसल्याने पाणीटंचाई आणि त्यामुळेच बरीचशी अस्वच्छता. वातावरणात नैराश्य. स्वच्छतेचे खूप महत्त्व समजून सांगून देखील त्याचा परिणाम होत नव्हता. त्यावर उपाय म्हणून एका बहुउद्देशीय संस्थेची मदत घेतली. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य व स्वच्छता साहित्य उपलब्ध करून घेतले. विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसारच लेखन साहित्य दिले आणि ते साहित्य वर्षभर पुरूनही उरले. स्वच्छता साहित्यामुळे विद्यार्थ्यांना हुरूप आला. स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता कशी करायची ? ते समजावून सांगितले. त्यासाठी बक्षिसांचे आयोजन केले. स्वतः विद्यार्थ्यांची आठवड्याला नखे कापून देऊ लागले. सुईदोरा आणून तुटलेले बटण, कपडे शिवून देऊ लागले. आहे ते कपडे स्वच्छ करून घातले, तर आपण सुंदर दिसतो, हे समजावून सांगितले आणि फायनली सर्वांनी आंघोळ केली तेव्हा सर्वांचे उजळलेले चेहरे बघून मला खूप आत्मिक आनंद झाला. स्वच्छतेसाठी वारंवार पाठपुरावा करू लागले. बालकथा बोधकथा यांचाही आधार घेतला. विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे आत्मविश्वास जागा झाला. सर्व विद्यार्थी केसांना मेहंदी लावायचे. मुले केस वाढवायचे. वेगवेगळ्या स्टाईलने केस कापायचे, त्यांच्या त्या सवयी पूर्णतः बदलून टाकल्या. पुन्हा केसांना मेहंदी लावायची नाही, केस खराब होतात. मेहंदी न लावता केस सुंदर दिसतात. मुलांच्या हातातील कडे, मुलींचा मेकअप, लिपस्टिक लावून शाळेत येणं हळूहळू बंद केलं. शाळेत आरसा, कंगवा, नेलकटर याची व्यवस्था करून ठेवली. सुट्टीत हात- पाय धुण्यासाठी साबण, नॅपकिन आणून ठेवला. स्वच्छता केल्यानंतर विद्यार्थी पुन्हा पुन्हा आरशात बघू लागले. जेवणाच्या आधी हात पाय धुऊन श्लोक म्हणणं. मगच जेवण. हा नित्यक्रम झाल्याने एखादा विद्यार्थी जर हा नित्यक्रम भंग करत असेल तर दुसरे विद्यार्थी तक्रार करू लागले. एकूणच विद्यार्थ्यांनी हे सर्व स्वीकारलं होतं आणि त्यांना आवडलं ही होतं. दूर दूर राहणारे विद्यार्थी आता माझ्याभोवती घोटाळू लागले बोलू लागले, सांगू लागले. ते आता प्रगतीची प्रकाशवाट चालू लागले. 




































... क्रमशः

--आशा चिने, शाळा गुरेवाडी, सिन्नर.

Wednesday 5 June 2019

जीवन गौरव दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन नाशिक- २०१९


जीवन गौरव दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन नाशिक- २०१९ 

     ५ जूनला नाशिक येथे जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य व रामशेज शिक्षण संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिन व रामशेज शिक्षण संस्था रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित जीवन गौरव दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन नाशिक- २०१९ मध्ये प्रथमच "कविकट्टा" रंगला. 
      मा.पितामह हरिदास कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनामध्ये सर्व सहभागींना आकर्षक सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व विशेषांक देऊन गौरविले. 

     जीवनगौरवने साहित्यिकांना व्यासपीठ मिळून मिळवून दिल्याबद्ददल जीवन गौरवचे मनःपूर्वक आभार..

कविता सादरीकरण...
🎯 शब्द..!

कुरवाळिसी मायेने, प्रेम दाविती शब्द !
बाळ बने नटखट, लाडिक बनती शब्द !!

काढी वाभाडे सहज, परखड असे हे सत्य !
धार चढती जर शब्दांना, मन दुखविती शब्द !!

समज असे जर शब्दांत, घरे बनती स्वर्ग !
खेळ मांडीती घरांत, गुंता वाढवी शब्द !!

ध्येय असे जर शब्दांत, घडवी इतिहास स्तुत्य !
कौतुकाचे बीज पेरता, भविष्य बनवी शब्द !!

असे सामर्थ्य पराकोटीचे, करी सन्मान नित्य !
क्रोध होई अनावर, शस्त्र बनती शब्द !!



शिक्षण तज्ञ मा.भाऊसाहेब चासकर, जयदीप दादा व विजया ताई यांच्यासमवेत

असेन मी...नसेन मी... अक्षरी उरेन मी....


-----------------------------------------------

गुरूमाऊली कविकट्टा

प्रमुख उपस्थिती
मा. राजन लाखे(कविकट्टा प्रमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१६,१७,१८)
मा. उत्तम कांबळे    मा.शिवराम बोडके
(संमेलनाध्यक्ष)             (स्वागताध्यक्ष)
मा. हरिदास कोष्टी   मा.दीपक अमोलिक
(कविसंमेलनाध्यक्ष)        (कविकट्टा प्रमुख)
मा. रामदास वाघमारे (प्रमुख संपादक) 
जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य
मा. दिगंबर शिंदे(पुणे जिल्हा सहसंपादक)
समन्वयक: मा. मिरा वाघमारे, मा. संदीप सोनवणे, मा. निरूपा बेंडे व सर्व जीवन गौरव 
परिवार 
आयोजक
सौ. रूपाली बोडके सौ. वैशाली भामरे
नाशिक जिल्हा सहसंपादक
जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य








शिक्षकाकडून आणि साहित्यिकांच्या साहित्यातूच समाजात बदल होणे शक्य - उत्तम कांबळे 




औरंगाबाद / प्रतिनिधी 
      शिक्षकच समाजात ख-या अर्थाने चांगला बदल घडवून आणू शकतो. त्यामुळे शिक्षकाला साहित्याची जाण असणे महत्वाचे आहे असे मत दुस-या राज्यस्तरीय शिक्षक जीवन गौरव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  साहित्यिक उत्तम कांबळे यांनी मांडले.यावेळी विचारमंचावर स्वागताध्यक्ष शिवराम बोडखे, माजी संमेलनाध्यक्ष राजन लाखे ,पुणे जिल्हा संपादक डी.बी. शिंदे,  जीवन गौरव मासिक चे मुख्य संपादक रामदास वाघमारे, संपादक कल्याण अन्नपुर्णे, मु.अ. संदिप सोनवणे, वंदना सलवदे, आयोजक रूपाली बोडके, वैशाली भामरे,सरपंच जिजाबाई तांदळे,गावातील जेष्ठ नागरिक यांचेसह राज्यातील साहित्यिक, कवी, शिक्षक , जीवन गौरवचे सहसंपादक मोठया संख्येने उपस्थित होते. 
       जीवन गौरव मासिक  महाराष्ट्र राज्य व रामशेज हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाची साक्ष देणा-या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात दुसरे राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक साहित्य व कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.  यावेळी संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे पुढे बोलताना म्हणाले की, साहित्य हे माणसाला घडवत असते. जीवन सुंदर करण्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि स्फूर्ती देत असते. जुने साहित्य हे परंपरावादी असून ते मानवी जीवनात हवे तेवढे बदल करण्यास कारणीभूत ठरत नाही. ते साहित्य धर्म, जात, कर्मकांड, अंधश्रद्धा, रुढीपंरपरा, यामध्येच अडकले होते. स्वातंत्र्यानंतर फार बदल झाले. लोकशाही मूल्य आली. त्यामुळे समाजात फार बदल झाले. त्या साहित्यात माणुस केंद्रस्थानी आणला. माणसाला महत्व दिले. कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, बाबुराव बागूल यांनीही देव, धर्म जात यापेक्षा माणूसच श्रेष्ठ आहे हे ठणकावून सांगितले हे शिक्षकाने लक्षात ठेवायला हवे. त्यादृष्टीने साहित्य निर्माण व्हायला हवे. त्या खरेपणासाठी साहित्यिकाने साहित्यातून आपली भूमिका स्पष्ट मांडली पाहिजे. शिक्षक सतत जागरूक असला पाहिजे. तोच ख-या अर्थाने समाजात बदल घडवून आणू शकतो. यावेळी माझी संमेलनाध्यक्ष राजन लाखे यांनी मराठी भाषेसंबंधी व साहित्यासंबधी आपले मत मांडले. यावेळी संपादक रामदास वाघमारे यांनीही जीवन गौरव साहित्य संमलन घेऊन अनेकांना लिहितं, बोलतं करणे, समाजात लेखनीच्या माध्यमातून, शिक्षकाच्या हातून बदल घडवून आणणे हाच जीवन गौरव साहित्य संमेलन घेण्यामागचा उद्देश आहे असे सांगितले. संमेनाची सुरुवात ग्रंथदिंडीने संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, स्वागताध्यक्ष शिवराम बोडके, संपादक रामदास वाघमारे, डी. बी. शिंदे, आयोजक रूपाली बोडखे व वैशाली भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. उद्घाटनानंतर प्रा. डॉ. सतीश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात डॉ. रत्ना चौधरी, वेच्या गावित व भाऊसाहेब चासकर आदि उपस्थित होते. त्यानंतर मुख्य सभामंडपात हरिदास कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या अनेक कविंनी कविता सादर केल्या. यावेळी उपसंपादक मीरा वाघमारे, संदीप सोनवणे, संतोष दातीर, कुणाल पवार, प्रा. अशोक डोळस, गीता केदारे, आदिंनी मार्गदर्शन केले. तर दुस-या हॉलमध्ये कविकट्टा डी. बी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याध्येही महाराष्ट्रातून आलेल्या विविध कविंनी कविता सादर केल्या. यासाठी दिपक अमोलिक, योगिनी कोठेकर, सीमा गांधी आदिंनी मदत केली. 
संमेलन स्थळी पुस्तकाचे विविध स्टॉल व  जेवनात आमरस, मांडे, कुडNयाचे खास आकर्षण ठरले , शेवटी प्रा.सतिश म्हस्के व संदिप ढाकणे यांनी सुत्रसंचलन केले. तर आभार संमेलन आयोजक रुपाली बोडके यांनी मानले.

    नंदुरबारला होणार तीसरे राज्यस्तरीय जीवन गौरव साहित्य संमेलन
     जीवन गौरव मासिक, औरंगाबाद च्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक साहित्य संमेलन घेण्यात येते. शिक्षकांच्या अंगी असणाNया सुप्त कलागुणांना वाव मिळावा, लेखनाचे कौशल्य निर्माण व्हावे म्हणून अनेक नवनवीन शिक्षकांना साहित्य प्रवाहात आणण्याचे काम हे मासिक करते.  २०२० मध्ये घेण्यात येणारे तिसरे जीवन गौरव राज्यस्तरीय साहित्य संमेलन नंदुरबार येथे घेण्याचे ठरले आहे. हे संमेलन व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी नंदुरबार येथील दिनेश वाडेकर व पिंपळनेर येथील प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी घेतली आहे. नुकत्याच नाशिक येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात फिरता चषक दिनेश वाडेकर व प्रा. डॉ. सतीश मस्के यांना संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, संपादक रामदास वाघमारे, हरिदास कोष्टी, रूपाली बोडखे, वैशाली भामरे, संतोष दातीर यांच्या उपस्थितीत देण्यात आला. या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन घेण्यात येणार आहे. यामध्ये नंदुरबार वासियांना यामध्ये सहभागी होता येईल. त्याचबरोबर नंदुरबार वासियांना ज्ञानाची मेजवानीही मिळणार आहे.

 (c/p)


संयोजकांचे मनःपूर्वक आभार.....

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect